नाणारला सर्वपक्षीय विरोध, समर्थक भाजप एकाकी; सरकार प्रकल्प गुंडाळणार?

नाणारला होणारा सर्वपक्षीय विरोध विचारात घेता भाजप एकाकी पडला आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प आता राहणार की, गुंडाळला जाणार याबबात औद्योगिक क्षेत्र आणि राजयकीय वर्तुळासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Updated: Apr 15, 2018, 06:39 PM IST
नाणारला सर्वपक्षीय विरोध, समर्थक भाजप एकाकी; सरकार प्रकल्प गुंडाळणार? title=

रत्नागिरी: सध्या राज्यभर गाजत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने सौदी अरेबियाच्या कंपनीसोबत करार केल्यानं या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध अधिकच तिव्र झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत एक कणभर देखील जमीन रिफायनरी प्रकल्पाला देणार नसल्याचं इथले स्थानिक सांगत आहेत. दरम्यान, शिवसेना, मनसेनंतर आता काँग्रेसनेही या वादात उडी घेत प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. नाणारला होणारा सर्वपक्षीय विरोध विचारात घेता भाजप एकाकी पडला आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प आता राहणार की, गुंडाळला जाणार याबबात औद्योगिक क्षेत्र आणि राजयकीय वर्तुळासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

नाणारप्रश्नी भाजप एकाकी

या प्रकल्पाबाबत केंद्र सरकारकडून हा करार झाल्यानंतर विविध पक्षांचे बडे नेते आता नाणारच्या दौऱ्यावर येणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. काँग्रेसच्या नेत्यांची एक टीम १९ एप्रिल रोजी नाणारवासियांच्या भेटीला येणार आणि त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील नाणारमध्ये २३ एप्रिल रोजी स्थानिकांना भेटण्यासाठी आणि आपली नाणारबाबतची भूमिका मांडण्यासाठी दौरा करणार आहेत.

शरद पवारही नाणार दौऱ्यावर

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील १० मे रोजी नाणारच्या दौऱ्यावर येणार असून, तेही स्थानिक जनतेच्या भावना जाणून घेणार आहेत. दोनच दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांनी देखील आपला नाणार प्रकल्पाला विरोध असल्याचं जाहीर केलंय.. त्यामुळे भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवलाय.