कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार यावर देणार भर, पाहा नवीन आदेश आणि सूचना

 आता कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार काही गोष्टींवर भर देणार आहे.  

Updated: Jun 25, 2021, 09:33 PM IST
कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार यावर देणार भर, पाहा नवीन आदेश आणि सूचना title=

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर महाआघाडी सरकारने अनलॉक जाहीर केले. त्यानुसार पाच लेव्हल करण्यात आली. आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने सरकारने कडक निर्बंध जाहीर केले असून नव्याने नियमावलीही जाहीर केली आहे. आता कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार काही गोष्टींवर भर देणार आहे. यात 70 टक्के लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच कोविडचा प्रसार रोखण्यासाठी टेस्ट-ट्रॅक-ट्रीट या पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब करण्यावर भर देणार आहे.

कोविड-19 चा प्रसार होणार नाही, याची काळजी !

कोविड-19 चा प्रसार होणार नाही याची काळजी घेण्याबाबत कृषी आराखडा तयार करण्यात येणार आहे. नागरिकांना बंधने सुकर होणे सुनिश्चित करण्याबरोबरच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी खालील विशेष कृतीवर भर देण्यात येणार आहे.

- लोकजागृतीच्या उपक्रमांद्वारे लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर असणार आहे. पात्र लोकांपैकी किमान 70 टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार.

Coronavirus : या सहा जिल्ह्यांत कडक निर्बंध

- कोविडचा प्रसार रोखण्यासाठी टेस्ट-ट्रॅक-ट्रीट या पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब करण्याच्या जिल्ह्या स्तरावर निर्देश सरकारने दिले आहेत.

- कोविडच्या विषाणूचा हवेतून प्रसाराचा गुणधर्म लक्षात घेता हेपा फिल्टर्स किंवा एक्झॉस्ट फॅनचा वापर करून वातानुकूलनाच्या उचित नियमांचे पालन करीत कामकाजाच्या ठिकाणांची आणि कार्यालयांची सुरक्षितता निश्चित करणे संबंधितांना बंधनकारक असणार आहे.

- सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अपेक्षित चाचण्या आणि आरटी-पीसीआर चाचण्या तसेच इतर चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्यावर भर देण्यात येणार आहे. तशा सूचना करण्यात आल्या आहेत.

- कोविडरोधक वर्तणूक न करणाऱ्यांवर प्रभावीपणे दंडात्मक कारवाई करावी.गर्दी, जमाव आणि मेळाव्यांना प्रोत्साहन मिळेल असे सोहळे, कार्यक्रम, उपक्रम टाळावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

- न्याय्य पद्धतीने कन्टेनमेन्ट क्षेत्रे घोषित करावीत जेणेकरून छोट्या क्षेत्रावर, विशेष करून बाधित क्षेत्रावरच बंधने लागू होतील.

- विशेष करून विवाह सोहळे आणि उपाहारगृह, मॉल यासारख्या गर्दीची अधिक शक्यता असलेल्या ठिकाणांची तपासणी करून CAB च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फिरती पथके नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

CAB चे नियम हे बंधने कमी करण्यासाठी अत्यावश्यक आहेत. हे सामाजिक पातळीवर पाळायचे नियम आहेत. या नियमांचे पालन न केल्यास नागरीकांना दंड होईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोविड-19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत.

नव्या मार्गदर्शक सूचना

- अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहणार

- इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 पर्यंत सुरू राहणार

- मॉल्स, थिएटर बंदच राहतील

- रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेनं सकाळी 7 ते 2 सुरू राहतील

- दुपारी 2 नंतर होम डिलिव्हरी सेवा सुरू राहिल

- लोकल सेवा बंदच राहिल

- सार्वजनिक मैदानं, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंगला सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत परवानगी 

- खाजगी, शासकीय कार्यालयं 50 टक्के उपस्थितीत सुरू राहणार 

- चित्रपट, मालिकांच्या चित्रिकरणास स्टुडिओत परावनगी

- लग्न सोहळ्याला 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी 

- अत्यंसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहता येणार