राज्यात 'या' 15 जिल्ह्यात कोरोनाचा कहर, ग्रामीण भागात कडक लॉकडाऊनचे संकेत

राज्यात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. (Coronavirus in Maharashtra) त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात शहरी भागात कोरोना आटोक्यात येत असताना ग्रामीण भागात (lockdown in rural areas) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे.  

Updated: May 22, 2021, 10:07 AM IST
राज्यात 'या' 15 जिल्ह्यात कोरोनाचा कहर, ग्रामीण भागात कडक लॉकडाऊनचे संकेत title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. (Coronavirus in Maharashtra) त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात शहरी भागात कोरोना आटोक्यात येत असताना ग्रामीण भागात (lockdown in rural areas) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. राज्यात 15 जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिसून येत आहे. यात अमरावती, बुलडाणा, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ,  सोलापूर, सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, अकोला, वाशिम, बीड, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग  यांचा समावेश आहे. त्यामुळे येथे कडक लॉकडाऊनचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. दरम्यान, येथे कोरोनाची लक्षणे असलेल्यांना होमक्वारंटाईन न करता विलगीकरण करा, अशा सूचना सरकारने केल्या आहेत.

राज्य सरकारच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना 

राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शुक्रवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांसोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीला सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख उपस्थित होते. अडीच तास बैठक झाली असून या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी  15 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालकांना बारकाईने सर्वेक्षण करण्यास सूचना दिली गेली आहे. तसेच जे बाधित असतील, ज्यांना लक्षणे असतील त्यांना होमक्वारंटाईन न करता विलगीकरण करा. होमक्वारंटाईनबाबत समाधानी नसल्याचे यावेळी स्पष्ट केले.

रुग्णसंख्येचा आकडा कमी होत नसल्याने चिंता

15 जिल्ह्यात लॉकडाऊन, कडक निर्बंध असूनही रुग्णसंख्येचा आकडा कमी होत नाही आहे. विशेषतः एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जो कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्ह आकडा आला होता त्यापेक्षा जास्त आजही या आठवड्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी  15 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. कडक निर्बंध असून रुग्णसंख्येत वाढ का होत आहे? त्याची कारणे तपासा. त्याच्याप्रमाणे दुरुस्ती झाली पाहिजे. त्यादृष्टीने त्यांना सूचना द्याव्यात आणि मार्गदर्शन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांन दिल्या होत्या. यापद्धतीने आज आम्ही बैठक घेतली, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

 महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ज्यांची व्यवस्था चांगली आहे, त्यांचे समजू शकतो. परंतु ज्यांच्याकडे व्यवस्था चांगली नाही, अशा व्यक्तींना घरात क्वारंटाईन केल्याने, तो संपूर्ण घराला बाधित करतो आणि बाहेर पडून बाहेरच्या लोकांना देखील बाधित करत असतो. म्हणून कोणत्याही परिस्थिती होम क्वारंटाईन अजिबात करु नये. त्यामुळे आता त्यांच्यासाठी विलगीकरणाची व्यवस्था करावी. तिथेच प्राथमिक उपचार केले तर त्याला पुढे रुग्णालयात जाण्याची गरज नाही. या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याचा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

 कोरोना चाचणी प्रमाण वाढण्यावर भर

 कोरोना चाचणीचे प्रमाण वाढण्याची सूचना दिली आहे. चाचण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पॉझिटिव्हचा आकडा वाढू शकतो. परंतु त्याची काळजी करण्याचे कारण नाही. पॉझिटिव्ह आकडा वाढला तरी रुग्णावर उपचार लवकर केले तर तो लवकर बरा होऊन घरी जातो आणि त्याचा परिणाम ऑक्सिजन, रेमडेसिवीर इथंपर्यंत जात नाही. तसेच मृत्यूचे प्रमाण कमी होते. त्यानुसार आम्ही सगळ्यांना सूचना दिल्या आहेत, असे थोरात म्हणाले.