तरुणांची मानसिकता ढासळतेय? नाशिकमध्ये एकाच दिवशी चार तरुणांनी संपवलं जीवन

देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून धक्कादायक म्हणजे यात तरुणांचं प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये चार तरुणांनी टोकाचं पाऊल उचललं.

Updated: Apr 12, 2023, 02:22 PM IST
तरुणांची मानसिकता ढासळतेय? नाशिकमध्ये एकाच दिवशी चार तरुणांनी संपवलं जीवन title=
प्रतिकात्मक फोटो

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक :  नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालानुसार भारतात दरवर्षी आत्महत्येच्या (Suicides) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणांचं प्रमाण सर्वाधिक आहे. आर्थिक समस्या  (Financial Problems), प्रेमभंग, कौटुंबिक कलह (Family Problem), व्यसनधीनता (Addiction) अशा कारणांमुळे तरुण टोकाचं पाऊल उचलायला लागले आहेत. नाशिकमध्ये (Nashik) सोमवारी एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये चार तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या चारही तरुणांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. आर्थिक समस्या आणि कौटुंबिक कलह ही कारणं समोर आली आहेत.

एकाच दिवशी चार आत्महत्या
सिडकोतील उपेंद्रनगर सहावी स्कीम इथल्या रामदास मुरलीधर रोकडे यांनी राहत्या घरात पंख्याला लटकून आत्महत्या केली. याबाबत अंबड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंबडच्या कर्मयोगीनगर भागात रागर रतन कुमार या तरुणाने बेडरूममधील पंख्याच्या कडीला गळफास घेत स्वतःचे जीवन संपवलं. तिसरी घटना कामठवाडयात घडली. इथं राहणाऱ्या महेश मधुकर आडीवडेकर या तरुणाने बेडरुममधील छताच्या पंख्याला लटकून आत्महत्या केली. तर रवींद्र मनसाराम पाटील यांनी भिंतीच्या हुकाला झोक्याच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या सर्व आत्महत्यांच्या प्रकरणात अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीये

तरुणांमध्ये अधिक प्रमाण
कोरोना काळानंतर तरुणांमध्ये आत्महत्या तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. विशेषत: 31 ते 50 वयोगटातील तरुणांची संख्या जास्त आहेत. विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या अधिक होती. लॉकडाऊनच्या काळात शालेय विद्यार्थ्यांमध्येही आत्महत्येची प्रवृत्ती वाढल्याचंही समोर आलं आहे. 

कौटुंबीक कलह
तज्ज्ञांच्या मते 37.2 टक्के आत्महत्या कौटुंबीक समस्यांमुळे होत आहेत. तर 17.1 टक्के आत्महत्या आजारपणामुळे झाल्या आहेत. इशाऱ्याचे संकेत लवकरात लवकर ओळखता आले तर आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात.