त्याच्या डोळ्यांत शिक्षणाचं ध्येय होतं, पण 'ढिम्म प्रशासना'नं त्याचा जीव घेतला

ज्या रिक्षाने धमाणे गावातील माध्यमिक शाळेत जात होता, त्याच रिक्षाच्या चाकाखाली येऊन दर्शनचा मृत्यू झाला

Updated: Jul 4, 2019, 07:32 PM IST
त्याच्या डोळ्यांत शिक्षणाचं ध्येय होतं, पण 'ढिम्म प्रशासना'नं त्याचा जीव घेतला title=

प्रशांत परदेशी, झी २४ तास, धुळे : दर्शन मनोज कोळी... पाचवीत शिक्षण घेणारा उमदा विदयार्थी... ढिम्म प्रशासकीय यंत्रणेमुळे त्याला जीवानिशी मुकावं लागलंय. दर्शन शिंदखेडा तालुक्यातील साहूर या तापी नदी काठी असलेल्या गावातील विद्यार्थी... त्यांच्यासोबत या गावात शंभराच्या घरात मुलं आहे जे शिक्षणाच्या ओढीनं अन्य गावांमध्ये असलेल्या शाळांमध्ये जातात. मात्र त्यांच्या या शिक्षणात सर्वात मोठा अडसर आहे ती एसटी बससेवा... गावचा रस्ता खराब असल्यामुळे एसटी महामंडळाने साहूरची बससेवा चक्क बंद करण्याचा निर्णय घेतला. ही बससेवा बंद झाल्यामुळे शाळेत जायचं कसं? असा प्रश्न इथल्या चिमुरड्यांसमोर उभा राहिला. मग अनेकांनी खासगी वाहनाची मदत घेतली. वाहन खासगी असल्यानं त्यात किती प्रवाशी, विद्यार्थी बसवायचे याचे बंधन नाही. ना कुठला सुरक्षा निकष पूर्ण करायचा... जीव मुठीत घेऊन असुरक्षित प्रवास करून शिक्षण घ्यायचे, असा साहूरच्या मुलांचा नित्य क्रम. हाच नित्यक्रम गुरुवारी दर्शनच्या जीवावर उठला.


दर्शनचा मृत्यू 

दर्शनचा खरा खुनी कोण?

ज्या रिक्षाने धमाणे गावातील माध्यमिक शाळेत जात होता, त्याच रिक्षाच्या चाकाखाली येऊन दर्शनचा मृत्यू झाला. प्रथमदर्शनी हा अपघात आहे मात्र हा अपघात घडण्यामागच्या कारणाचा शोध घेतला तर दर्शनचा खरा खुनी कोण? हे सुज्ञांच्या लक्षात येईल. 

गावात बस सुविधा सुरु व्हावी यासाठी दर्शन त्याच्यासोबतचे विद्यार्थी आणि ग्रामस्थ गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करत होते. काही महिन्यांपूर्वी तर दर्शनने जिल्हाधिकारी कार्यालयात बससाठी आंदोलनही केले होते. त्यावेळी खुर्ची उबविणाऱ्या सन्माननीय अधिकाऱ्यांनी बससेवा सुरु करण्याचे आश्वासन देतानाच पुन्हा असे आंदोलन केले तर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचे पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे सांगतात. मात्र त्यावेळी नावाला बस सुविधा सुरु करण्यात आली आणि पुन्हा रस्ता चांगला नाही म्हणून ती बंद करण्यात आली. 

रस्त्यासाठी निधी मिळाला पण... 

रस्त्याचे काम व्हावे यासाठी मग ग्रामस्थांनी संघर्ष सुरु केला. भांड-भांड भांडून अखेर रस्त्यासाठी निधी मंजूर झाला. रस्ता होणार, बस येणार आणि शिक्षण सुरक्षित होणार असा विश्वास निर्माण झाला आणि त्याचवेळी राजकारणाची माशी शिंकली. रस्त्यासाठी मंजूर निधी अन्यत्र वळविण्यात आल्याचे साहूर ग्रामस्थांना कळाले. मग हा निधी अन्यत्र वळू नये यासाठी पाठपुरावा सुरु होता. 

बस येत नाही म्हणून शिक्षण अपूर्ण सोडता येत नव्हते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, या विचाराने दर्शन आणि त्याच्यासोबतचे मुलं खूप शिक्षण घ्यावे आणि गावाचा कायाकल्प करावा यासाठी झगडत होते. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून खासगी रिक्षाने साहूर ते धामणे प्रवास करत होते. मात्र या रिक्षात गरजेपेक्षा जास्त मुलांना कोंबलं जात होतं. या प्रवासामुळे जीव धोक्यात आहे हे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कळत होते. मात्र त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता... काय करणार? या हतबलतेने मुलांना रिक्षात शाळेत पाठवण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्याची भीती होती तेच घडले, ज्या रिक्षाने गुरुवारी दर्शन गावातून निघाला त्याच रिक्षाच्या मागच्या चाकाखाली आल्याने तो चिरडला गेला आणि एका उमद्या विद्यार्थ्यांचा अंत झाला. 


गावकऱ्यांचा आक्रोश

छोट्याशा खेड्यातला गरीब विद्यार्थी तो... कुणाला काय पडलंय?

महानगरांमध्ये असा कोणी एक विद्यार्थी मेला असता तर तोबा चर्चा झाली असती. निषेध नोंदवला गेला असता. प्रशासन खळबळून जागे झाले असते, मात्र दर्शनचा मृत्यू हा मेट्रो शहरात झाला नाही, तो एका छोट्याश्या खेडे गावात झाला, त्यामुळे त्याच्या जाण्याने कोण किती हादरले आणि जागे झाले? हा प्रश्नच आहे. पण दर्शनचे जाणे अधिक सोस देणारे आहे. कारण तो अशा भागातून चिकाटीने शिक्षण घेत होता जिथे त्याचे डोळे उज्ज्वल भविष्याकडे लागले होते. साहूर या छोट्याश्या गावातून त्याला जागतिक भरारी घेऊन आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करायचे होते. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता तो या जगात नाही. 

दर्शन गेला, आक्रोश झाला, संतप्त ग्रामस्थांनी त्याचा देह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. मग प्रशासनाला जाग आली... अधिकारी जमा झाले. 'हा मृत्यू गंभीर आहे, असे व्हायला नको', अशा एक ना अनेक बाता करत संतप्त ग्रामस्थांना अधिकाऱ्यांनी धीर दिला... आणि बस सेवा सुरु करण्याचे आणि रस्त्याचे काम करण्याचे मागचेच आश्वासन नव्याने देऊन मोकळे झाले.

आता पुन्हा बस सुरु होईल... मग बंदही होईल आणि आणखीन एखादा 'दर्शन' शिक्षणासाठी जग सोडेल. कुठे थांबणार हे... साध्या आणि निकडीच्या सोई-सुविधाही आपण अद्याप निर्माण करू शकलो नाही, पण याची कुणालाही खंत नाही... हेच बोचरं सत्य!