कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत घट नाही

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच

Updated: Nov 19, 2018, 02:24 PM IST
कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत घट नाही title=

बीड : मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र संपता संपत नाही आहे. आता तर त्यात वाढ होतानाच दिसत आहे. मराठवाड्यात गेल्या 11 महिन्यात 781 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही आत्महत्यांच्या संख्येत घट होताना दिसत नाही आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातंमध्ये भीषण दुष्काळ आहे. त्यामुळं ही संख्या आणखीन वाढण्याची भीती व्यक्त होते आहे.

सर्वाधिक 161 आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात 122 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. विरोधक देखील याच मुद्द्यावर सरकारला घेरण्य़ाचा प्रयत्न करतील.

दरम्यान आजपासून राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. यानिमित्तानं मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि मुस्लीम आरक्षण या तिन्हीच्या मागणीसाठी आजच विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. त्याचप्रमाणे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.