राज्यात पावसाचा कहर, आतापर्यंत 129 जणांचा मृत्यू

राज्यात विविध ठिकाणी एनडीआरएफकडून मदतकार्य सुरु

Updated: Jul 23, 2021, 05:48 PM IST
राज्यात पावसाचा कहर, आतापर्यंत 129 जणांचा मृत्यू title=

मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी नदी-नाले तुटूंब भरुन वाहत आहेत. अनेक मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक गावांमध्ये पुराच पाणी शिरल्याने संपर्क तुटला आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळत आहेत. त्यामुळे मार्ग बंद आहेत. राज्याच्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज राज्यातील पूरस्थितीबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, दरड कोसळणे यावेळी खूप मोठ्या प्रमाणात घडलंय. तळीये गावातील मृत्यूचा आकडा अजून वाढू शकतो. आतापर्यंत राज्यात एकूण १२९ जणांचा मृत्यू झाला आहे.

'प्रशासकीय यंत्रणा पाऊस, अंधार, पूल पडले असताना तळीये इथे सकाळी लवकर पोहचले आणि मदत कार्याला सुरुवात केली. आमची सगळी यंत्रणा फिल्डवर आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी काम करतायत. पुरानंतर मदत करणेही जिकरीचे आहे. स्वच्छता करण्याचं महत्त्वाचं काम यापुढे असेल.' अशी माहिती ही त्यांनी दिली.

रत्नागिरीत वायुदलाचे हेलिकॉप्टर लोकांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन ही दिलं.