कोल्हापूरमध्ये पवासाचा कहर; पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी

 राज्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी, राज्याचा मोठा भाग कोरडाठाक आहे.

Updated: Jul 15, 2018, 12:03 PM IST
कोल्हापूरमध्ये पवासाचा कहर; पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी title=

कोल्हापूर: संपूर्ण जिल्ह्यासह कोल्हापूरमध्ये पावसाचा कहर कायम आहे. त्यामुळे पंचगंगा नदीनं इशारा पाणी पातळी ओलांडली असून, ती ३९ फुटांवर आलीय. नदीची धोका पातळी ४३ फूट आहे. जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील ६२ बंधारे पाण्याखाली असुन पाच राज्यमार्ग तर १८ जिल्हामार्ग बंद झाले आहेत. तर, दुसरीकडे कृष्णा नदिच्या पाणी पातळीतही मोठी वाढ होत आहे. नृसिंहसवाडी इथल्या दत्त मंदिरमध्ये कालच पाणी शिरलं होत. आज हे मंदिर अर्धअधिक पाण्यात गेलं आहे.

राज्याचा मोठा भाग कोरडाठाक

दरम्यान, राज्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी, राज्याचा मोठा भाग कोरडाठाक आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाची नागरिकांना प्रतीक्षा आहे. नंदुरबार आणि शिंदखेडा तालुक्यात तर पाऊसच पडला नाही. धुळे जिल्ह्यात सरासरी २००  मिलिमीटरही पावसाची नोंद झालेली नाही. नंदुरबार जिल्ह्याची स्थितीही सारखीच आहे. नंदुरबार तालुक्यात तर गेल्या दीड महिन्यात १०० मिलीमीटर तर शिंदखेडा टाळूंख्यात ८६ मिलीमीटर पाऊस पडलाय. अत्यल्प पावसामुळे या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी बैचेन आहे. तापी नदी सोडल्याचा एकही नदी नाल्याला पूर आलेला नाही. विशेष म्हणजे अशीच स्थिती राहिली तर ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघरमध्ये अतिवृष्टीचा अंदाज 

मुंबई: येत्या २४ तासांत मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. आजही समुद्राला मोठी भरती असणार आहे. दुपारी १ वाजून ४९ मिनिटांनी समुद्राला भरती येईल यावेळी ४. ९७ मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या मोसमातली ही सर्वात मोठी भरती असणार आहे. त्यामुळे प्रशासनानं किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा दिलाय.