Monsoon Updates : शेतकऱ्यांनो... पेरणीची घाई नको; पाहा कुठे अडकलाय मान्सून

त्याचा प्रवास मात्र अपेक्षेपेक्षा संथ गतीनंच सुरु आहे   

Updated: Jun 14, 2022, 08:14 AM IST
Monsoon Updates : शेतकऱ्यांनो... पेरणीची घाई नको; पाहा कुठे अडकलाय मान्सून  title=
छाया सौजन्य- स्कायमेट

मुंबई : अर्धा जून संपला, पण अद्यापही मान्सून काही हवा तसा महाराष्ट्रात स्थिरावलेला नाही असंच चित्र सध्या दिसत आहे. वातावरण ढगाळ होत आहे, सोसाट्याचा वाराही सुटत आहे, पावसासाठी पूरक वातावरणही तयार असूनही पावसाच्या सरी काही बरसताना दिसत नाहीत. थोडक्यात काय, तर यंदाचा मान्सून लांबला नसला, तरीही त्याचा वेग मात्र मंदावल्याचं स्पष्ट होत आहे. (imd monsoon updates konkan maharashtra mumbai)

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र ओलांडून मान्सून मराठवाड्यापर्यंत पोहोचला आहे. पण, पावसाचं प्रमाण मात्र कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

येत्या पाच दिवसांमध्ये मान्सूनची दमदार नसली तरीही तुरळक प्रमाणातील हजेरी अपेक्षित आहे. 

येत्या 2 दिवसांत राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. एकिकडे पावसानं तग धरलेला नसकानाच वरुणराजा स्थिरावल्याशिवाय पेरणीची घाई करू नका, असा मोलाचा सल्ला हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. 

मान्सूननं आतापर्यंत कोकण भाग चांगलाच व्यापला आहे. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर इथं तो 11 जून रोजीच पोहोचला आहे. पण, अद्यापही मान्सूनची पकड मात्र पक्की नसल्याचं लक्षात येत आहे. तेव्हा आता मान्सूनच्या वाटेवरचे अडथळे दूर होऊन तो केव्हा बरसतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.