पावसाअभावी पुन्हा एकदा रेल्वेने पाणी येण्याची लातुरकरांना भीती !

 लातूर शहरावर पुन्हा एकदा जलसंकट घोंगावू लागलं आहे. 

Updated: Jul 21, 2019, 07:31 AM IST
पावसाअभावी पुन्हा एकदा रेल्वेने पाणी येण्याची लातुरकरांना भीती !  title=

शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर : दीड महिना उलटून गेला तरी अद्याप म्हणावा तसा पाऊस न पडल्यामुळे लातूर शहरावर पुन्हा एकदा जलसंकट घोंगावू लागलं आहे. कारण मांजरा धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस अधिकच कमी होऊ लागली आहे. लातूरला १० दिवसाआड प्रमाणेच पाणी पुरवठा झाला तर ऑगस्ट अखेरपर्यंत पुरेल इतकंच पाणी मांजरा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे २०१६ प्रमाणेच रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ लातूरवर येते का काय अशी भीती लातूरकरांना वाटू लागली आहे. 

शिक्षणाच्या अनोख्या लातूर पॅटर्नमुळे, दिग्गज राजकारण्यांचा जिल्हा आणि १९९३ च्या महाप्रलयकारी भूकंपामुळे लातूरची ओळख ही देशभर झाली. मात्र २०१६ सालापासून लातूर ओळखले जाऊ लागले ते दुष्काळामुळे... २०१६ मध्ये लातूरवर रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ  आली आणि लातूरची नको असलेली ओळख देशातच नव्हे तर किंबहुना जगभर झाली. यावर्षीही पावसाने दगा दिल्यामुळे पुन्हा एकदा अशाच परिस्थितीच्या उंबरठ्यावर लातूर उभे ठाकले आहे. 

लातूर शहराला पाणी करणाऱ्या बीड-उस्मानाबादच्या सीमेवरील मांजरा धरणाच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. सध्या मांजरा धरणात ०८ ते ०९ एमएलडीच पाणी शिल्लक आहे. या पाण्यावर ०५ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेले लातूर शहर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज आणि उस्मानाबाद जिल्हयातील कळंब या शहरासहित अनेक छोटी मोठी गावं अवलंबून आहेत. सध्या लातूर शहराला १० दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. मात्र त्यातही अनियमितता असल्यामुळे तसेच पावसाने दगा दिल्यामुळे पुन्हा एकदा लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा होतो की काय अशी भीती सर्वसामान्य लातूरकरांना वाटू लागली आहे. 

लातूर महानगरपालिका सध्या भाजपच्या ताब्यात असून महापौर सुरेश पवार यांनी रेल्वेने पाणी पुरवठा होईल का ? या प्रश्नाला बगल देत अजूनही चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच लातूरकरांच्या संयमबाबद्दल आभार मानले. मात्र काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूरच्या या परिस्थितीला भाजप सरकार दोषी असल्याचे म्हटले आहे. २०१६ मध्ये रेल्वने पाणी पुरवठा केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचे पाणी आणण्याचे आश्वासन भाजप पाळलं नसल्याचा आरोप केलाय. 

लातूरच्या आजच्या परिस्थितीला मांजरा धरणाची देखरेख करणारा सिंचन विभाग, प्रशासन, लातूर महानगरपालिका ही तितकेच जबाबदार आहेत. २०१६च्या दुष्काळानंतर झालेल्या  पावसाळयात आणि २०१७ च्या पावसाळ्यात सलग दोन वर्षे मांजरा धरणे १०० टक्के भरले होते. मात्र धरण भरल्यानंतरही धरण्यातील पाणी साठा मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. यावर त्यावेळी झी २४ तासने प्रकाशही टाकला होता. मात्र त्यानंतरही मांजरा धरणाचे अभियंता शाहूराज पाटील आणि त्यांच्या वरिष्ठांवर कसलीच कारवाई किंवा साधी चौकशी करण्याची तसदी कुठल्याही अधिकाऱ्यांनी किंवा राजकारण्यांनी का घेतली नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

जर २०१६-२०१७ मध्येच धरण भरल्यानंतर धरणातील पाण्याचा योग्य विनियोग केला असता तर लातूर शहरावर आज घोंगावणारे जलसंकट तयारच झाले नसते. आता लातूरकर वरुण राजाच्या जोरदार आगमनाच्या प्रतिक्षेत आहेत.