राहुल गांधींनी पक्ष बदलायला सांगितला- राधाकृष्ण विखे-पाटील

बाळासाहेब विखेंबद्दलच्या विधानामुळे आपण दुखावल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. 

Updated: Apr 27, 2019, 03:18 PM IST
राहुल गांधींनी पक्ष बदलायला सांगितला- राधाकृष्ण विखे-पाटील  title=

शिर्डी : राहुल गांधींनी पक्ष बदलायला सांगितला आणि राहुल यांची भूमिका धक्कादायक होती असे वक्तव्य पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. पक्षावर नाराज होत त्यांनी आपला राजीनामा सोपावला होता तो स्वीकारण्यात आला आहे. त्यानंतर राधाकृष्ण यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण घडामोडींवर भाष्य केले. बाळासाहेब विखेंबद्दलच्या विधानामुळे आपण दुखावल्याचे त्यांनी सांगितले. याचमुळे सुजय भाजपात गेल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राधाकृष्ण विखे पाटील हे आजच्या पत्रकार परिषदेत आपल्या पुढच्या राजकीय भुमिकेबद्दल सांगतील अशी शक्यता होती. पण यावेळी त्यांनी आपल्या पुढच्या राजकीय वाटचालीबद्दल सांगणे टाळले. सध्या आपण पाणी प्रश्नावर काम करणार असून लोकसभा निवडणूक संपल्यावर कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.  

अहमदनगरच्या जागेबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर ते या जागेसाठी प्रयत्न करतील अशी आशा होती मात्र त्यांनी सुजय विखेंनी काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीकडून लढण्याचा सल्ला दिल्याचा खुलासा विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी शिर्डीतील पत्रकार परिषदेत केलाय. नगरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार तीनदा पराभूत झाला होता त्यामुळेच नगरची जागा सुजय विखेंसाठी काँग्रेसला सोडावी अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत मी स्वत: काँग्रेस अध्यक्षांशी चर्चा केला मात्र त्याचवेळी पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्याविरोधात मुक्ताफळं उधळली. वडिलांबाबत केलेलं वक्तव्य मनाला वेदना देणारे असल्याचे विखे यावेळी म्हणाले. मुलानेच भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने विरोधीपक्ष नेतेपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शिर्डीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारावरही त्यांनी वक्तव्य केले. 

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

काँग्रेसने कोणत्याही राजकीय तडजोडी केल्या नाहीत.

राष्ट्रवादीला त्रास नको म्हणून प्रचार केला नाही 

काही घडलं तर विखेंची चूकं असं चित्र उभं केलं.

पवार विरुद्ध विखे असे चित्र रंगवलं गेलं. 

मला राजकीय आत्महत्या करायला भाग पाडले जात होते.  

पवारांनी आमच्याविरोधात मुक्ताफळं उधळली 

बाळासाहेबांबद्दल विधान केल्याने सुजय भाजपात 

पक्षनेतृत्वाने भक्कम भूमिका घ्यायला हवी होती.