महाड तळीये दुर्घटना : आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढले, आणखी माणसे ढिगाऱ्याखाली?

Mahad, Raigad landslide : मागील दोन दिवस कोकणात आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. (Maharashtra Rain) पूरपरिस्थिती नियंत्रणात आली आहे. पाणी ओसरले आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात दरडीखालून आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.  

Updated: Jul 24, 2021, 11:47 AM IST
महाड तळीये दुर्घटना : आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढले, आणखी माणसे ढिगाऱ्याखाली? title=
Pic Courtesy: ANI

अलिबाग, रायगड : Mahad, Raigad landslide : मागील दोन दिवस कोकणात आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. (Maharashtra Rain) पूरपरिस्थिती नियंत्रणात आली आहे. पाणी ओसरले आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात दरडीखालून आतापर्यंत 49 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. महाड तालुक्यात तळीये 38, पोलादपूर तालुक्यात साखर सुतारवाडी इथे 5  तर पोलादपूर तालुक्यातच केवनाळे इथे 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. (Mahad, Raigad landslide update : A total of 49 bodies retrieved from the debris )

बाळाचा मृतदेह बाहेर काढला

दरम्यान, तळीये गावात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बाळाचा मृतदेह बाहेर काढला आहे. मदत आणि बचावकार्य सुरुच आहे. रायगडच्या महाडमधील तळीये गावात दरड कोसळल्याने तब्बल 38 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. तळीये गावात अवघ्या काही महिन्यांच्या मृत बाळाला बाहेर काढले आहे. तळीये गावावर मोठं संकट कोसळले आहे.

महाडमधील तळीये गावाचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. डोंगर कोसळ्याने काही क्षणांत अनेकांचे संसार चिखलात रुतून गेले. अनेक ठिकाणी दरडी कोसळ्याने अनेकांना धोका पोहोचला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्यांना आता बाहेर काढण्याचे काम एनडीआरएफच्या टीमकडून युद्धपातळीवर केले जात आहे. आतापर्यंत 49 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, तब्बल 50 पेक्षा अधिक माणसे अजूनही ढिगाऱ्याखालीच असल्याची भीती व्यक्त होत आहे.

अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा

महाराष्ट्रात रविवावारपासून अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला. कोकणवर तर पुराचं संकटच ओढवले. चिपळूण पाण्याखाली गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. संततधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात पुरामुळे हाहाकार उडाला आहे. हे संकट कमी म्हणून काय, तळीये गावावर दरड कोसळली. गुरुवारी झालेली ही घटना शुक्रवारी समोर आली. प्रचंड पाऊस आणि विविध भागांचा तुटलेला संपर्क यामुळे वेळेत मदत पोहोचू शकली नाही. त्यामुळे प्रचंड जीवितहानी झाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याचे बोलले जात आहे.