निवडणुकीत यश अपयश मिळत असतं, आम्ही खचून जाणार नाही: मुख्यमंत्री शिंदे

Devendra Fadanvis News: मला सरकारमधून मोकळं करा,अशी मागणी फडणवीस यांनी पक्षाच्या नेत्यांकडे केली आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यांमुळं राज्यात चर्चेला उधाण आलं आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 5, 2024, 04:25 PM IST
निवडणुकीत यश अपयश मिळत असतं, आम्ही खचून जाणार नाही: मुख्यमंत्री शिंदे title=
maharashtra cm eknath shinde reaction on Devendra Fadnavis offers to resign as deputy CM

Devendra Fadanvis News: लोकसभेत भाजपला राज्यात मोठा फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मला सरकारमधून मोकळं करा, अशी मागणी फडणवीसांनी नेतृत्वाकडे केली आहे. फडणवीसांच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाहीये. भाजपलाही अवघ्या 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे. राज्यात भाजपच्या पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली असून मला सरकारमधून मोकळं करावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात जिथे भाजप जागा हरला आहे. भाजपला जिथे कमी जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात जिथे  भाजपाला सेट बॅक बसला आहे. त्या सगळ्यांची जबाबदारी माझी आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यामुळं फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का? अशा चर्चांना जोर धरला आहे. या सगळ्या चर्चांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, मी आत्ताच प्रतिक्रिया ऐकली. निवडणुकांमध्ये हार-जीत ही होतच असते. या लोकसभा निवडणुकांबद्दल बोलायचं झाल्यास मतदानाची टक्केवारी पाहिली तर या निवडणुकीत जागा जास्त मिळाल्या असत्या तर मताची टक्केवारी वाढली असती. मुंबईत 2 लाख मतं जास्त मिळाली असती. त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून काम केलं आहे. हे जे यश-अपयश आहे ते सामूहिक जबाबादारी आहे असं समजतो. आम्ही टीम म्हणून काम केलंय. राज्यात मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा आम्ही एकत्र काम केलंय. यापुढेदेखील एकत्र काम करायचं आहे. त्यामुळं ही सामूहिक जबाबदारी आहे. एका निवडणुकीने सगळं काही संपत नसतं. तसंच, एका निवडणुकीमुळं  हार-जीत आम्ही खचून जाणारे नाहियेत. त्यांनी काही भावना व्यक्त केल्या असतील पण आम्ही टीम म्हणून काम करत राहणार आहोत. एकनाथ शिंदे यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही प्रतिक्रिया दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

माझ्याकडून देशाच्या जनतेच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचे आभार. पंडित नेहरू यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद देण्यासाठी आभार. हा ऐतिहासिक क्षण आहे. विधानसभेच्या निवडणुकीत उडीसा आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश मध्ये जनतेने भाजप आणि एनडीएला कौल दिला. महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. किंबहुना आमच्या पेक्षा खूप कमी जागा मिळाल्या. संविधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला होता. त्याच्याशी आमची लढाई होती. हा नरेटिव्ह आम्हाला थांबवता आला नाही हे खर आहे. मविआला २ कोटी ५० लाख मतं आणि महायुतीला २ कोटी ४८ लाख मतं मिळाली आहे. मुंबईत आम्हाला पूर्वीपेक्षा दोन लाख मतं जास्त मिळाली आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

आपण मागील वेळचा जरी विचार केला. २०१९ भारतीय जनता पक्षाला 27.84% एवढी मतं होती. यंदा आमची  दीड टक्के मतं कमी झाली आहेत. कांद्याच्या मुद्दयाचा परिणाम झालाय. मराठा आरक्षण दिल्यानंतरही नरेटिव्ह तयार करण्यात आला. त्याचा फटका मराठवाड्यात बसला.भाजप ला महाराष्ट्रात जो सेटबॅक झाला आहे. त्याची जबाबदारी मी स्वतः घेत आहे. मला सरकारमधून मोकळं करा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.