फडणवीस, हे राज्य तुम्हाला रक्तबंबाळ करायचं आहे का? मनोज जरांगे यांचा सवाल

Maratha Reservation : मराठा सगेसोयरेसाठी मनोज जरांगे पाटील येत्या 20 जुलैपासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याआधी मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 17, 2024, 03:12 PM IST
फडणवीस, हे राज्य तुम्हाला रक्तबंबाळ करायचं आहे का? मनोज जरांगे यांचा सवाल title=

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला (Fasting) बसणार आहेत. 20 जुलैपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलाय. 20 जुलैलाच बैठकही होणार आहे. याच बैठकीत मुंबईला कधी जाणार याची तारीखही सांगितली जाणार आहे. आता मेलो तरी मागे हटणार नाही असा इशाराही मनोज जरांगेंनी दिलाय. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आमदारांनाही नवा इशारा दिलाय. विधानपरिषद निवडणुकीत (Assembly Election) मराठा आमदारांनी ओबीसी नेत्यांना मतदान केलं. मात्र निवडून आलेल्या ओबीसी आमदारांनी जर मराठ्यांना त्रास दिला. तर मतदान करणा-या मराठा आमदाराला पाडा अशा इशारा जरांगेंनी दिलाय.

राज्य सरकारला इशारा
20 जुलैपासून आमरण उपोषण करण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे, यावेळचं उपोषण कठोर असणार आहे असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी यांनी अंतरवाली सराटीतून राज्य सरकारला दिलाय. मराठा समाजाला गोड गोड बोलायचं हा देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा डाव दिसतो .ओबीसी नेते मराठा समाजाच्या अंगावर घालायचे, फडणवीस इतके चीचोरे चाळे का करताय, असा सवाल देखील जरांगे यांनी उपस्थित केलाय. फडणवीस तुम्हाला हे राज्य रक्त बंबाळ करायचं आहे का असाही सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. 

देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
फडणवीस साहेब बैठक बोलावतात, पण मराठ्यांविषयी प्रत्येकाला द्वेष ओकायला लावतात. फडणवीस यांचं नेमकं काय चाललंय हेच कळत नाही, आमच्या सगेसोयऱ्यांना मराठ्यांना त्रास द्यायचा, तुम्ही आमच्या सोयऱ्यांना त्रास देणार ,फडणवीस साहेब तुमचे पण सोयरे आहेत राज्यात, आम्ही नाही त्रास देत त्यांना, मला तर फडणवीस साहेबांच आश्चर्य वाटायला लागलय असा निशाणा जरांगे पाटील यांनी साधलाय. 

बार बार एकच शब्द काढायचा शरद पवारांनी काही दिलं नाही, त्यांच्याकडे मोर्चा वळवा ते कुठे सत्तेत आहेत आता, सत्तेत तुम्ही आहे त्यांनी काय नुकसान केलं आम्हाला माहीत आहे, म्हणून तुम्हाला करायचं का आता, असा सवालही जरांगे पाटील यांनी विचारला आहे. फडणविस साहेब आमचे शत्रू नाहीत, पण तूम्ही डाव टाकायचे बंद करा असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.