भाजपचे राज्यापालांना पत्र, 'महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करा'

Maharashtra Political Crisis : भाजपने आता वेगळी खेळी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहिले आहे. 

Updated: Jun 24, 2022, 01:20 PM IST
भाजपचे राज्यापालांना पत्र, 'महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करा' title=

मुंबई : Maharashtra Political Crisis : भाजपने आता वेगळी खेळी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहिले आहे. राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने आपण त्यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

राज्यातील राजकीय स्थिती ही अत्यंत अस्थिरतेची गेल्या तीन दिवसांत बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि तदनंतर स्वत: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनिषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे, असे दरेकर यांनी पत्रात नमुद केले आहे.

राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णयसपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. 160 च्या वर शासनआदेश 48 तासांत जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे, असे राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

अडीच वर्ष निर्णयशून्य असलेले महाविकास सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे. पोलीस दल व अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा सुद्धा घाट घातला जात आहे.
महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्यादृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.