Sharad Pawar : पुण्यात बदल होतोय याचा अर्थ... कसब्याच्या निकालावरुन शरद पवार यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

Kasba Bypoll : तब्बल 28 वर्षे भाजपच्या (BJP) ताब्यात असलेला कसबा पेठ (Kasba Bypoll) मतदारसंघ कॉंग्रेसकडे आला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांनी हेमंत रासनेंना (Hemant Rasane) तब्बल 10 हजार 915 मतांनी पराभूत करून पुण्यातील भाजपचा बालेकिल्ला उद्धवस्त केलाय

Updated: Mar 4, 2023, 10:51 AM IST
Sharad Pawar : पुण्यात बदल होतोय याचा अर्थ... कसब्याच्या निकालावरुन शरद पवार यांची महत्त्वाची प्रतिक्रिया title=
(फोटो सौजन्य - PTI)

Maharashtra Politics : दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा (kasba peth assembly constituency) जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत (kasba peth bypoll) महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर (ravindra dhangekar) यांचा विजय झाला आहे. तब्बल 28 वर्षे भाजपच्या (BJP) ताब्यात असलेल्या या मतदारसंघाला रविंद्र धंगेकर यांनी सुरुंग लावला आहे. भाजपच्या हेमंत रासने (hemant rasane) यांचा धंगेकर यांनी तब्बल 10 हजार 915 मतांनी पराभूत केले आहे. उमेदवाराबाबत नाराजी, मतदारांना गृहीत धरणे यासारख्या अनेक कारणांमुळे कसब्यातील मतदारांनी भाजपलं नाकारल्याचे म्हटले जात आहे. या निकालाबाबत आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत सक्षम उमेदवार नसल्याने पराभव झाल्याची अप्रत्यक्ष कबुली भाजपच्या नेत्यांनीही अप्रत्यक्षरित्या दिली आहे. दुसरीकडे कसब्यातील शनिवार पेठ (Shanivar Peth) आणि सदाशिव पेठ (Sadashiv Peth) हे हेमंत रासनेंचे मतदारसंघ होते. या व्यतिरिकत बाकीच्या मतदारसंघात रासनेंना कमाल दाखवता आलेली नाही. त्यामुळे मोठ्या फरकाने हेमंत रासने यांना पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.

"हा बदल आहे. जी मतांची माहिती बघितली केवळ दोन ठिकाणी भाजपला अधिक मतं मिळाली आहेत. तर इतर ठिकाणी रवींद्र धंगेकर यांना अधिक मतं मिळाली आहेत. हा बदल आहे आणि तो पुण्यात होतोय याचा अर्थ लोक वेगळा विचार करतायत," असे शरद पवार म्हणाले.

"देशात बदलाचा मूड तयार होतोय. महाराष्ट्रातल्या तीन चार निवडणुका काय सांगतायतय? भाजपला जवळपास एकसुद्धा जागा मिळालेली नाही. पुण्याच्या निवडणुकीबद्दल सांगायची गरज नाही. कसबा हा कुणाचा अड्डा होता आणि लोकांनी काय निर्णय घेतला हे जगजाहीर आहे. देशाचे चित्र बघितलतं तर केरळ, तमिळनाडूमध्ये भाजप नाही. कर्नाटकमध्ये खासदार आमदार फोडून भाजपचं राज्य आलं आहे. आंध्र प्रदेश, पंजाब, दिल्ली, हिमाचल, पश्चिम बंगालमध्ये भाजप नाही. यातून बदलाचे चित्र दिसत आहे. त्याचे परिणाम उद्याच्या निवडणुकीवर दिसून येणार आहेत," असे शरद पवार म्हणाले.