शिंदेंनी CM निवडण्याचे अधिकारही मोदी-शाहांना दिल्याने राऊत चिडून म्हणाले, 'स्वत:ला शिवसेना...'

Sanjay Raut On Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या विधानांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता राऊतांनी खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 28, 2024, 11:42 AM IST
शिंदेंनी CM निवडण्याचे अधिकारही मोदी-शाहांना दिल्याने राऊत चिडून म्हणाले, 'स्वत:ला शिवसेना...'
राऊतांचा शिंदेंना टोला

Sanjay Raut On Eknath Shinde: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. बुधवारी ठाण्यातील घरी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहांकडे दिल्याच्या मुद्द्यावरुन राऊतांनी निशाणी साधला आहे. जर स्वत:ला शिवसेना म्हणवणारे आपल्या पक्षाचा निर्णय दिल्लीकडे सोपवत असतील तर त्यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच नाव यापुढे घेऊ नये असा टोला राऊतांनी लगावला आहे.

Add Zee News as a Preferred Source

...तर राष्ट्रपती राजवट लावून...

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री ठरवण्यासाठी होत असलेल्या विलंबावरुन निशाणा साधला. "200 पेक्षा जास्त जागा जिंकलेल्या युतीला मुख्यमंत्री ठरवता येत नाही. भाजपाला जवळपास पूर्ण बहुमत असतानाही महाराष्ट्रचं मुख्यमंत्रिपद असं का लटकून पडलं आहे हे जनतेला कळत नाही. जनतेला त्यात इन्ट्रेस्ट नाही. कारण हा जनतेचा कौल नाही. हा जनतेचा कौल आम्ही मानत नाही. तीन पक्षांना पाशवी बहुमत असताना अशी परिस्थिती आहे. विधानसभेची मुदत 26 तारखेला संपली आहे. या ठिकाणी आम्ही असतो तर राष्ट्रपती राजवट लावून ऐव्हाना आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं असतं. मात्र नियम कायदे फक्त विरोधीपक्षासाठी आहेत. बहुमत प्राप्त झालेल्या महायुतीला कोणताही नियम नाही. महाराष्ट्राला मुख्यमंत्री कधी मिळेल, कोण मिळेल आम्ही सगळेच वाट पाहत आहोत," असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

शिंदेंनी सर्व अधिकार दिल्लीला दिल्यावरुन टोला...

शिंदेनी सर्व अधिकार दिल्लीकडे सोपवल्याचा उल्लेख करत राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊतांनी, 'प्रश्न असा आहे की त्यांचा असा दावा कसा असू शकतो?' असा सवाल उपस्थित केला. "जे स्वत:ला शिवसेना मानतात त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीतील मोदी-शाहांना दिले असतील तर त्यांनी यापुढे बाळासाहेबांचं नाव घेऊ नये. जर शिवसेना निवडणूक आयोगाने तुमच्या हातात दिलेली आहे. त्यासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार मोदी-शाहांना देत असाल तर तुम्ही बाळासाहेबांचा स्वाभिमान, अभिमान असं बोलू नका," असा टोला राऊतांनी लगावला आहे.

नक्की वाचा >> पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना झापलं! म्हणाले, 'माझा पक्ष, माझे वडील अजित पवार कोणत्याही...'

मुख्यमंत्रिपदासंदर्भात विचारण्यात आलं असता राऊतांनी, "ज्यांच्याकडे बहुमत ते मुख्यमंत्री ठरवतील. त्यांच्या युतीमधील दोन पक्षांनी दोन अधिकार दिल्लीला दिले आहेत. दिल्ली ठरवेल महाराष्ट्रचं भविष्य," असं उत्तर दिलं. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More