Maharashtra Weather News : आज गोविंदा ओलेचिंब! राज्याच्या कोणत्या भागांना पावसाचा धडाका, कुठे रिपरिप?

Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत असून, हा पाऊस गोविंदांचा आनंद द्विगुणित करताना दिसणार आहे.   

सायली पाटील | Updated: Aug 27, 2024, 07:18 AM IST
Maharashtra Weather News : आज गोविंदा ओलेचिंब! राज्याच्या कोणत्या भागांना पावसाचा धडाका, कुठे रिपरिप?  title=
Maharashtra Weather news Konkan ghat region to expect heavy rainfall latest updates

Maharashtra Weather News : राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसानं सोमवारी काही अंशी उसंत घेतली. पण, हाच पाऊस आता पुन्हा एकदा जोर धरणार असून, दहीहंडीच्या दिवशी गोविंदा ओलेचिंब होणार असंच स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे. सध्या राजच्यात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, याच प्रणालीमुळं पाऊस सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

पुढील 24 तासांचा अंदाज घ्यायचा झाल्यास मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं पावसाचा मारा होत असताना रचले जाणारे मानवी मनोरे पाहणं अनेकांसाठी पर्वणी तर, गोविंदांसाठी मात्र आव्हान ठरणार आहे. 

हेसुद्धा वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, जबाबदार कोण? ठाण्याच्या कंत्राटदाराकडे काम?

 

मंगळवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी अधून-मधून कोसळणार असून, या धर्तीर ठाणे आणि पालघरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, पुणे आणि रायगडसह साताऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. काही भागांमध्ये ताशी 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यादरम्यान शहरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 26°C इतकं असेल. 

कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये सातत्यानं तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, अनेक भागांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. देशात गुजरातपासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं पर्जन्यमानात वाढ झाली आहे.