Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उर्वरित भागांमध्ये मात्र तापमान 41 अंशांवर

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या उन्हाळी ऋतूमध्येच विदर्भात मात्र अवकाळीची अवकृपा पाहायला मिळत आहे. त्यातच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाड्यानं नागरिक त्रस्त आहेत.   

सायली पाटील | Updated: Mar 27, 2024, 09:01 AM IST
Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उर्वरित भागांमध्ये मात्र तापमान 41 अंशांवर   title=
Maharashtra Weather news vidarbha konkan marathwada latest temprature update in marathi

Maharashtra Weather News : राज्याच्या (Konkan Coast) कोकण किनारपट्टीपासून मध्य आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. फक्त सकाळी आणि दुपारीच नव्हे, तर आता सायंकाळीसुद्धा उष्ण वारे जीवाची काहिली करत आहेत. हवामानाची ही स्थिती पुढील काही दिवस किंबहुना पुढील एका महिन्यासाठी तरी कायम राहणार असून, त्यादरम्यान तापमानात चढ-उतार होणार आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील अकोल्यामध्ये सर्वोच्च अर्थात 41 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. 

मेघगर्जनेसह पावसाची शक्यता 

विदर्भाच्या पूर्व भागापासून कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्यामुळं राज्यात ढगाळ वातावरणाची निर्मितीही होताना दिसत आहेत. त्यातच हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तासांत राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र हवामान कोरड राहण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईमध्ये उकाडा आणखी तीव्र होणार असून, दुपारच्या वेळी उष्णतेच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. इतकंच नव्हे, तर दिवसा तापमान कोरडं राहणार असून, हवेतील आर्द्रतेमुळं उकाडा अधिक जाणवणार आहे. त्यामुळं तीव्र उन्हामध्ये घराबाहेर पडण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्या अथवा गरज नसल्यास उन्हात बाहेर पडणं टाळा असं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागानं दिलं आहे. 

फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या उत्तर आणि पूर्वेकडील काही राज्यांमध्येसुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशात सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं हवामानाची ही प्रणाली पाहायला मिळत आहे. 

हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : '...मग पक्ष चोरला कसं म्हणता?' बारामतीतून सुनेत्रा पवार सासऱ्यांना खडा सवाल 

31 मार्चपर्यंत आसाम, अरुणाचल प्रदेशसह मेघालयात ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल. तर, 27 ते 31 मार्चदरम्यान वायव्येकडील मैदानी क्षेत्रासह हिमालयाच्या पश्चिमेकडे असणाऱ्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.