मुंबई- ठाणे जोडणाऱ्या मेट्रो मार्गावरील 2 स्थानके वगळली; आता असा असेल मार्ग

Mumbai Metro 4 station: मुंबई महानगरात वेगाने उड्डाणपुल व मेट्रोचे जाळे तयार होत आहे. मेट्रो 4चे कामही वेगात सुरू आहे. मात्र, त्यापूर्वीच एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 19, 2023, 04:37 PM IST
मुंबई- ठाणे जोडणाऱ्या मेट्रो मार्गावरील 2 स्थानके वगळली; आता असा असेल मार्ग title=
Mumbai 2 stns off Metro 4 plan due to space crunch

Mumbai Metro 4 station: वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मेट्रोमुळं ठाण्यातील प्रवाशांना थेट मुंबईत येणार आहे. तसंच, हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही दक्षिण मुंबईत येण्याचा पर्याय उपलब्ध होईल. मात्र, या प्रकल्पात थोडे बदल करण्यात आले आहेत. जागेचा अडसर आणि प्रकल्पाचा वाढता खर्च यामुळं मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने दोन स्थानके वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो 4 मार्गावरील सुमननगर आणि अमर महाल ही दोन स्थानके वगळण्यात आली आहे. 

MMRDA ने यापूर्वी मेट्रो-2B (DN नगर-मांडाळे) योजनेतून नॅशनल कॉलेज स्टेशन वगळले होते. त्यानंतर आता पुन्हा स्थानके वगळ्यात आली आहे. पुरेशी जागा नसल्याने अमर महाल स्थानक बांधणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाहीये. जागेच्या कमतरतेमुळं उड्डाणपुल आणि हायटेन्शन वायर टॉवर बांधणे शक्य नाहीये, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मेट्रो 4 प्रकल्पातील पहिले स्थानक भक्ती पार्क येथील असून अमर महालपर्यंत पूर्ण पूर्व द्रुतगती मार्ग व्यापतो आणि नंतर एलबीएल रोडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी गरोडिया नगरमार्गे 90 फूट रस्त्यापर्यंत जातो. मात्र, आता अमर महाल स्थानक वगळण्यात आल्यामुळं प्रवाशांना 1 किमी दूर असलेल्या गरोडिया नगर स्थानकाचा वापर करावा लागेल. अमर महलच्या आधीचे स्थानक पूर्व द्रुतगती महामार्गावरील सिद्धार्थ कॉलनी आहे.

सूमन नगर स्थानक का वगळण्यात आले हेदेखील समोर आले आहे. सूत्रांनुसार, सायन-ट्रॉम्बे रोड आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे (EEH) च्या जंक्शनवर हे स्थानक आहे. तसंच, प्रकल्पाचा खर्चात कपात व्हावी यासाठी हे स्थानक वगळण्यात आले आहे. मेट्रो 4 प्रकल्पातील सिद्धार्थ कॉलनी स्थानक, जे पूर्वीच्या आराखड्यानुसार सुमन नगर स्थानकानंतर येणार होते, ते अशा प्रकारे बांधले जाईल की ते मेट्रो-2B च्या EEH स्थानकासोबत जोडले जाईल. 

मेट्रो 4 मार्गावरील दोन स्थानके हटवल्यामुळं या मार्गावरील स्थानकांची संख्या आता 30 झाली आहे. प्रत्येक स्थानकातील अंतर आता 1 किमी इतके असणार आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्थानके वगळण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.