मतदारांना प्रलोभनं देण्यासाठीची कोट्यवधी रुपयांची दारु, लाखोंची रोकड जप्त

फक्त दारू आणि रोकडच नव्हे, तर..... 

Updated: Oct 19, 2019, 08:44 PM IST
मतदारांना प्रलोभनं देण्यासाठीची कोट्यवधी रुपयांची दारु, लाखोंची रोकड जप्त  title=

मुंबई : निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून ते प्रचार संपेपर्यंतच्या काळात राज्याच आतापर्यंत तब्बल १४२ कोटी, ७७ लाखांचं सोनं, चांदी, रोकड आणि दारू जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ५२ कोटी ७० लाखांची रोकड आहे. तर, २१ कोटी रुपयांची दारुही यादरम्यान जप्त करण्यात आली आहे. 

फक्त दारू आणि रोकडच नव्हे, तर २० कोटी ७१ लाख रुपयांचे अमली पदार्थ आणि २४ कोटी ६६ लाखांच्या सोन्या- चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. मतदारांना अमिष दाखवण्यासाठी उमेदवारांनी या संपूर्ण काळात बऱ्याच चुकीच्या मार्गांचा अवलंब केला गेल्याचं पाहायला मिळालं आहे. निवडणुकीच्या रिंगणात पैशांचा महापूर वाहत असल्याचं पाहत विविध मार्गांचा अवलंब करत निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या यंत्रणांच्या मार्फत ही कारवाई केली आहे. 

रायगड जिल्ह्यात ४२ ठिकाणी वाहन तपासणी नाके 

विधानसभा निवडणुकांना फार कमी काळ उरलेला असतानाच आता महाराष्ट्रात सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात केल्याचं पाहायला मिळत आहे. या कारणास्तव रायगड जिल्ह्यात ४२ ठिकाणी वाहन तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत. 

निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैशाचं आमिष दाखवून मत विकत घेतलं जातं. यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून ठिकठिकाणी तपासणी पथक तैनात केली असल्याचं पाहायला मिळत आहे. 

कोणत्याही प्रकारची प्रलोभनं दाखवून चुकीच्या पद्धतीने मतदारांना भुलवण्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी म्हणून तैनात करण्यात आलेल्या या तपासणी पथकाने अलिबाग, पनवेल, कर्जत, श्रीवर्धन या ठिकाणावरून आतापर्यंत १५ लाख ९५ हजार  रुपये वाहनातून जप्त केले आहेत. तर ३१ लाख १८  हजार ९९४ रुपयांची, ९६ हजार १८२ लिटर दारूही पकडल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.