ती रडत होती, किंचाळत होती आणि कुत्रे तिचे लचके तोडत होते, चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला

Updated: Jan 20, 2022, 06:13 PM IST
ती रडत होती, किंचाळत होती आणि कुत्रे तिचे लचके तोडत होते, चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी जवळच्या भारकस इथली ही घटना आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात असून जिल्हा परिषदेविरोधात संताप पसरला आहे.

नेमकी घटना काय?
5 दिवस आधी चार वर्षांची अंजली दुपारच्या वेळेस घराजवळ खेळत होती. त्याचवेळी भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने अंजली खाली पडली. अंजली जोरजोरात रडत होती, किंचाळत होती. कुत्र्यांनी तिच्या कमरेला, पाठिला आणि पायाचे चावे घेतले. .

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अंजली गंभीर जखमी झाली. अंजलीला सुरुवातीला गावाजवळच्या टाकळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान अंजलीचा दुर्देवी मृत्यू झाला.

गावात संतापाचं वातावरण
भारकस गावात तसंच आजूबाजूच्या परिसरात भटके कुत्रे आणि डुकरांची दहशत असून गावातील लहान मुलांवर आणि लोकांवर भटक्या कुत्र्यांनी अनेकवेळा हल्ले केले आहेत. असं असतानाही ग्रामपंचायत, पोलीस, जिल्हा परिषदेकडे तक्रारी करुनही लक्ष देत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केलीय.