"गडकरींकडचा साबण लावला आणि गोरी झाले असं श्रीदेवी सांगत नाही तोवर..."; केंद्रीय मंत्र्यांचा शेतकऱ्यांना सल्ला

नागपुराताली एका कार्यक्रमात नितीन गडकरी लहान उद्योजकांना उत्कृष्ट मार्केटिंग तंत्राचा सल्ला दिला

Updated: Nov 27, 2022, 06:02 PM IST
"गडकरींकडचा साबण लावला आणि गोरी झाले असं श्रीदेवी सांगत नाही तोवर..."; केंद्रीय मंत्र्यांचा शेतकऱ्यांना सल्ला title=

Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी कायमच ओळखले जातात. नितीन गडकरी आपल्या भाषणांमधून नेहमीच अनेकांना प्रेरित करत असतात. कित्येक वेळा भाषणांमधून ते त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसतात. अनेकदा तर ते अधिकाऱ्यांनाही खडसावतातही. अशाच एका कार्यक्रमात त्यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (sridevi) यांचा उल्लेख करत एक उदाहरण दिले आहे. नागपुरात (Nagpur) आयोजित करण्यात आलेल्या ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या चर्चासत्रात नितीन गडकरी बोलत होते.

"मिळालेल्या उत्पादनाचे मार्केटिंग (marketing) कसे करायचे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ब्रॅडिंग करायला हवं. टिव्हीवर नागपूर ऑरेंज जाहीरात केली तर रिलायसन्सपासून गोदरेजपर्यंत आपण सर्वांना आपला माल विकायला सांगू. माल चांगला असेल तर दिल्लीतही विकायला सांगू. मार्केटिंग देखील स्किल आहे. आम्ही साखरेपासून साबण बनवतो आणि देशापेक्षा परदेशात जास्त विकतो. त्याला भावसुद्धा चांगला मिळाला," असे नितीन गडकरी म्हणाले.

"कोणीतरी श्रीदेवी जोपर्यंत सांगत नाही की, गडकरींकडचा हा साबण लावलं आणि मी गोरी झाली, तोवर गल्लीतली श्रीदेवी ते साबण वापरत नाही. मग साबण कितीही चांगला असू दे. कारण मार्केटमध्ये साहित्य विकणे एक कला आहे.फक्त चांगलं असून भागत नाही, तर चांगला दिसणं ही आवश्यक आहे. आजच्या काळात पॅकेजिंगला महत्त्व आहे," अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतमालापासून विविध उत्पादन तयार करणाऱ्या लहान उद्योजकांना उत्कृष्ट मार्केटिंग तंत्राचा सल्ला दिला.

यावेळी नितीन गडकरी यांनी संत्रा आणि मोसंबी पासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांसाठी नागपूर ऑरेंज नावाचा एक ब्रँड तयार करावा असा सल्लाही यावेळी गडकरींनी दिला. शेतमाल आधारित उत्पादनाला एक ब्रँड मिळाला तर लोक त्या उत्पादनांना सहज स्वीकार करतात असेही गडकरी म्हणाले.