Maharashtra Political Crisis: शरद पवारांकडून चूक झाली, जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य करताना शरद पवारांकडून (Sharad Pawar) चूक झाली असं विधान केलं आहे. या सर्वात प्रेमाची चूक असून ती शरद पवारांकडून झाली असल्याचं ते म्हणाले आहेत. प्रेमापोटी पार्थ पवारांना तिकीट द्यावं लागलं होतं असाही खुलासा यावेळी त्यांनी केला.   

शिवराज यादव | Updated: Jul 4, 2023, 06:36 PM IST
Maharashtra Political Crisis: शरद पवारांकडून चूक झाली, जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले title=

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य करताना शरद पवारांकडून (Sharad Pawar) चूक झाली असं विधान केलं आहे. या सर्वात प्रेमाची चूक असून ती शरद पवारांकडून झाली असल्याचं ते म्हणाले आहेत. प्रेमापोटी पार्थ पवारांना तिकीट द्यावं लागलं होतं असाही खुलासा यावेळी त्यांनी केला.  'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी जितेंद्र आव्हाड यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर परखडपणे आपली मतं मांडली.

शरद पवार की अजित पवार चूक नेमकी कोणाची? असं विचारण्यात आलं असता जितेंद्र आव्हाड यांनी प्रेमाची चूक असल्याचं सांगितलं. "काही गोष्टी आपण प्रेमापोटी करत असतो, हीच चूक असते. आपल्या घऱातही अशा अनेक गोष्टी घडत असतात. शरद पवारांकडून ही प्रेमाची चूक झाली. बोट ठेवेल ते मिळालं अशी एकच व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात होती ती म्हणजे अजित पवार. शरद पवारांमुळे अजित पवारांना सहजासहजी मिळत गेलं," असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.  

"मी मरेपर्यंत शरद पवारांसोबत असणार आहे. निष्ठा नावाची काही गोष्ट असते की नाही? लोकशाहीचा गळा घोटला जात होता तेव्हा तुम्ही काय करत होतात अशी विचारणा तुम्हाला पुढची पिढी विचारणा करेल," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. आपण काय फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी जन्म घेतला आहे का? अशी संतप्त विचारणाही त्यांनी केली. 

पार्थ पवारांना तिकीट नाकारण्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, "एका घऱात जास्त तिकीटं देणं योग्य नाही असं शरद पवारांचं म्हणणं होतं. म्हणून शरद पवारांनी माढामधून निवडणूक लढवली नव्हती. पण नंतर प्रेमापोटी पार्थ पवारांना तिकीट द्यावं लागलं होतं". 

"गोपीनाथ मुंडेंचं घर मोडत असताना हे मला जमणार नाही असं स्वत शरद पवारांनी सांगितलं होतं. असं करु नका असं ते म्हणाले होते. त्यांनी दोनदा बैठक घेतली होती. भांडणं आपापसात मिटवा असं आवाहन त्यांनी केलं होतं. या गोष्टी ते सांगत नाहीत. पण आता असे आरोप होताना हे सांगणं गरजेचं आहे. मुंडेचं घर त्यांनी स्वत मोडलं," असा मोठा दावाही जितेंद्र आव्हाडांनी केला. 

"सुप्रिया सुळेंनी कधी पक्षाच्या कामात ढवळाढवळ केली आहे का? त्यांनी कधी प्रफुल पटेल यांचं महत्त्व कमी केलं का? सुप्रिया सुळेंची चूक काय हे एकाने तरी मला दाखवावं. शेवटी तीदेखील मुलगी आहे. आपल्या वडिलांना काय वेदना होत आहेत हे तिला समजत नसेल का. ती अस्वस्थ होत नसेल का? सगळ्याचं इतकं बाजारीकरण झालं आहे का? कधीतरी आपणही वयोवृद्द होणार आहोत, तेव्हा आपल्या मुलाने असं केल तर काय होईल?," अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

2014 मघ्ये भाजपाला पाठिंबा देताना रणनीती चुकली होती अशी कबुली देताना महाविकास आघाडीत बीजं रुजली गेली असं आव्हाडांनी सांगितलं. अलिबागला निवडक नेत्यांची गुप्त बैठक झाली होती. त्यात मी शरद पवारांचं चारित्र्य, राजकीय प्रवास, हा पुरोगामी महाराष्ट्रासाटी आहे. सत्तेसाठी पाठिंबा देताना विचारांशी द्रोह करणं योग्य नाही हे मी म्हटलं होतं अशी माहिती आव्हाडांनी दिली. मी काही शरद पवारांच्या जवळ नाही. माझं त्यांच्यावर फार प्रेम आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.  

"अजित पवार आणि माझ्यात काही वैर नाही. आमचं चांगलं जमायचं. दिल्लीत आम्ही हसत गप्पा मारताना तुम्ही पाहिलं असेल. माझ्या हाऊसिंगच्या कामावर ते खूश होते. ते नाराजीही बोलून दाखवायचे. त्यांचा मैत्री करण्यासारखा स्वभाव आहे. आमचं पटत नव्हतं असं काही नाही. पण माझं आणि शरद पवारांचं वेगळं नातं आहे. पुरंदरेंच्या वेळी सगळे टीका करत असताना त्यांनी सर्वांच्या विरोधात जाऊन माझी बाजू घेतली होती हे कसं काय विसरु शकतो," असं आव्हाड म्हणाले. 

दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल विचारण्यात आलं असता आव्हाड म्हणाले "ज्या मुलाला हातावर बाळासारखं हातावर खेळवलं त्याने असं करावं. नियतीने यापेक्षा मोठा त्रास शरद पवारांना काय द्यावा. तो सर्वात लाडका विद्यार्थी होता. दिलीप म्हटलं की सगळं बाजूला. शरद पवारांना ह्रदय नाही असं वाटतं का? शरद पवारांनी मला दिलीपही मला जायचं आहे असं सांगून गेला, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. डोळ्यात एक अश्रू दिसत होता. इतका माणूस निष्ठूर नसतो. आपल्या घरात 12 वर्षं सोबत राहिलेला कुत्रा मेल्यावरही आपण जेवत नाही.  कुत्रा काही बोलत, नसतो मागत नसतो. पण सहवास नावाची काही गोष्ट आहे की नाही? प्रेम, सहवास यंच्या काही व्याख्या आहेत की नाही. सत्ता हीच व्याख्या असेल तर माणुसकीचा अंतच झाला. सत्तेसाठी सर्व काही ही व्याख्या जगाला माणुसकी बुडवणारी आहे".