...म्हणून आई-वडिलांनीच मुलीला विष देऊन जाळलं

धक्कादायक प्रकार आला समोर

Updated: Oct 10, 2018, 10:10 AM IST
...म्हणून आई-वडिलांनीच मुलीला विष देऊन जाळलं title=

मंगळवेढा : आंतरजातीय विवाह केल्यामुळे स्वत:च्या मुलीचा आई-वडिलांनी सहा जणांसह खून केल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीनं केला आहे. अनुराधा बिराजदार असं मृत महिलेचं नाव आहे. अनुराधाचा पती श्रीशैलनं पोलीस अधीक्षकांची भेट घेत तक्रार दाखल करुन घेण्याची विनंती केली आहे. 

श्रीशैलचे वडील विठ्ठल बिराजदार पाटील यांच्याकडे मंगळवेढ्यात सालगडी म्हणून काम करत होते. त्याचठिकाणी श्रीशैल आणि अनुराधाचं एकमेकांवर प्रेम जडलं. त्यांनी लग्न केल्याचं कळताच अनुराधाला विष देऊन जाळल्याचा आरोप श्रीशैलनं केला आहे. 

प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या सावत्र आई आणि वडिलांनी २२ वर्षीय मुलीची हत्या केल्याचा आरोप पतीने केला आहे. मुलगी ही बीएएमएसचे शिक्षण घेत होती. मुलीवर अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. अनुराधा ही कर्नाटकातील सिंदगी येथे बीएएमएसचं शिक्षण घेत होती.

वडील आणि सावत्र आई यांच्याकडून माझ्या जिवाला धोका असल्याचं देखील मुलीने एका चिठ्ठीत म्हटलं आहे. आई-वडील हे तिला मानसिक त्रास देत असून मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत असं देखील त्या चिठ्ठीत तिने म्हटलं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.