चंद्रपूर येथे भरधाव गाडीने अंगणात घुसून तीन चिमुकल्यांना चिरडले

आष्टी-गोंडपिंपरी मार्गावर एका भरधाव पिकअप वाहनाने तीन चिमुकल्यांना चिरडले. 

Updated: Aug 1, 2020, 09:49 AM IST
चंद्रपूर येथे भरधाव गाडीने अंगणात घुसून तीन चिमुकल्यांना चिरडले  title=

चंद्रपूर : आष्टी-गोंडपिंपरी मार्गावर एका भरधाव पिकअप वाहनाने तीन चिमुकल्यांना चिरडले. ही भरधाव जाणाऱ्या गाडीवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारी असणाऱ्या घराच्या अंगणात गाडी घुसली. या अपघातात एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना गोंडपिंपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथील आहे. पिकअप वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने रात्री हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आष्टी-गोंडपिंपरी मार्गाला लागून पंढरी मेश्राम यांचे घर आहे. भरधाव पिकअप वाहन घराच्या अंगणात घुसले. गाडीचा वेग जास्त असल्याने अंगणात असलेल्या अलेशा मेश्राम (७) या मुलीचा मृत्यू तर अस्मित मेश्राम (१०) आणी माही रामटेके (१२)  गंभीर जखमी झाले आहेत. अंगणात जोराचा आवाज आला आणि लहानमुलांच्या किंकाळ्यांचा आवाज आल्याने घरातील माणसे आणि आजुबाजुचे ग्रामस्थ अंगणाच्या दिशेने धावत सुटली. रात्र असल्याने काही कळायला मार्ग नव्हता. त्यात लहान मुलांच्या किंकाळ्यांच्या आवाजाने अंगावर काटा उभा राहत होता. धाडस करुन पाहिले असताना एक वाहन अंगणात घुसल्याचे दिसून आले. या वाहनाने अंगणात असणाऱ्या तीन मुलांना चिरडल्याचे दिसून आले. काय करायचे ते सुचत नव्हते. त्यातच एक चिमुकली गाडीच्या धक्याने बेशुद्धच पडलेली दिसून आली, अशी माहिती येथे घटनास्थळी दाखल झालेल्यांने दिली.

गाडीखाली आलेल्या चिमुकल्यांना वाचविण्यासाठी धडपड करण्याचा प्रयत्न सुरु होता. एका चिमुकलीने अखेरचा श्वास घेतला. तर दोन जखमींना ग्रामस्थांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातप्रकणी गोंडपीपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.