नागरिकत्व सुधारणा विधेयक मुस्लिमांसाठी घातक - प्रकाश आंबेडकर

 विधेयक मुस्लिमांसाठी घातक असल्याचं आंबेडकर म्हणाले.

Updated: Dec 11, 2019, 04:28 PM IST
नागरिकत्व सुधारणा विधेयक मुस्लिमांसाठी घातक - प्रकाश आंबेडकर  title=

जयेश जगड, झी मीडिया, अकोला : लोकसभेत नागरिकत्व विधेयक पारित झाल्यानंतर आता ते राज्यसभेत चर्चेसाठी आले आहे. या विधेयकावरुन विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. राज्यात सत्तेच्या नव्या नाट्यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी तिरकस टिका केली आहे. भाजप सरकारने नागरिकत्व सुधारणेचे नुकतेच मांडलेले विधेयक मुस्लिमांसाठी घातक असल्याचं आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे अकोला येथे जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

तर ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड काँग्रेसने सुरु केली होती. जे पुढे नेण्याचे काम भाजप करीत असल्याचे बोलत पुन्हा एकदा  आंबेडकरांनी ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्तिथ केला. राज्यातील पाचही जिल्हापरिषद स्वबळावर लढणार आल्याचा सूचक विधान यावेळी आंबेडकरांनी केले आहे. तर या सर्व प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंचा पोपट होईल असेही आंबेडकर म्हणाले आहेत.

विरोधात कसे ?

काही लोक देशातील जनतेमध्ये संभ्रम पसरवत आहेत की हा निर्णय देशातील मुस्लिमांच्या विरोधात आहे. पण कशाप्रकारे हे विधेयक मुस्लिमांच्या विरोधात आहे ? असा प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केला.

विरोधकांचा गोंधळ 

राज्यसभेत या विधेयकावरुन विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले. काँग्रेसने या विधेयकाला विरोध करताना सदनात गोंधळ घातला. दरम्यान, या विधेयकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सरकारची बाजू मांडली. हे विधेयक कसे चांगले आहे, यावर त्यांचा जोर दिसून येत होता. हे विधेयक कोणाच्याविरोधात नाही, हे वारंवार सांगितले. 

आसाममधील नागरिकांनी याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले. धर्माच्या आधारावर प्रतारणा सहन केल्यानंतर ज्या लोकांनी भारतात आश्रय घेतलाय अशा लोकांसाठी हे विधेयक आहे. या विधेयकामुळे कोट्यवधींना दिलासा मिळाला आहे. निर्वासितांना हक्क देणारे विधेयक असल्याचे अमित शाह यांनी म्हटले.

'त्या' दिवसापासून नागरिकत्व 

लोकसभेत संमती मिळाल्यानंतर राज्यसभेत नागरिकत्व विधेयकाची चर्चा सुरु आहे. हे विधेयक शरणार्थिंना त्यांचे अधिकार आणि सन्मान देणारे असून कोट्यावधी लोकांसाठी ही उमेद असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले. शरणार्थी ज्या तारखेला भारतात आले आहेत त्यांना त्यादिवसापासूनचे नागरिकत्व दिले जाईल असे अमित शाह यांनी म्हटले. तुम्ही मतांचे राजकारण करत असल्याचे काहीजण म्हणताहेत. पण जनता या विधेयकाच्या समर्थनात आहे. जनादेशापेक्षा मोठं काही नसत असेही ते म्हणाले.