Pune Koyta Gang: सासुरवाडीत आला आणि जीव गमावून बसला; दीड महिन्यानंतर जावयासह घडली भयानक घटना

Pune Koyta Gang: पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पसरली आहे. दुचाकी, रिक्षा आणि मोटारींची तोडफोड करण्यात आलेय. पोलिस तपास सुरु आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 6, 2023, 01:09 PM IST
Pune Koyta Gang: सासुरवाडीत आला आणि जीव गमावून बसला; दीड महिन्यानंतर जावयासह घडली भयानक घटना title=

Pune Koyta Gang:  सासुरवाडीत आलेल्या जावयाची हत्या झाली आहे. मावळमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मावळ तालुक्यात हत्यांचे सत्र सातत्याने सुरुच आहे. या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. सासरी आलेल्या जावयाचा अनोळखी व्यक्तींनी कोयत्याने वार करत खून केला आहे. हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.  

मावळ तालुक्यातील गहुंजे येथे ही घटना घडली आहे. सूरज काळभोर असे हत्या झालेल्या जावयाचे नाव आहे. मयत सूरज काळभोर यांचा दीड महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर सूरज काळभोर सासरी आले होते. 
रविवारी सकाळी ते शेतात फिरायला गेले असता त्यांच्यावर हल्ला झाला. थ तीन ते चार जणांनी सूरज यांना गाठले त्यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांचा निघृणपणे हत्या केली. हा प्रकार लूटमार करण्याचा उद्देशाने झाला असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच तळेगांव दाभाडे पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत

पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पसरली आहे. शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात टोळक्यानं वैमनस्यातून कोयते उगारुन दहशत माजवली आहे. या टोळक्यानं दुचाकी, रिक्षा आणि मोटारींची तोडफोड केली. या प्रकरणी पाच ते सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रवी ओरसे हे वडारवाडी भागातील गोलंदाज चौकात थांबले होते. त्या वेळी पाच ते सहा जण तिथे आले. त्यांच्याकडे लाठ्या-काठ्या आणि कोयते होते. टोळक्यानं परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करुन दहशत माजविली. ओरसे यांच्या गाडीची काच फोडली. तसच इतर वाहनांचीही तोडफोड केली. 

नाशिकमध्येही कोयता गँगचा दहशत पसरवण्याचा प्रयत्न

नाशिकच्या सिडको परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी रात्री भरवस्तीत कोयता गँगने धिंगाणा घातलाय. त्यात वीस ते पंचवीस वाहनांची तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रात्रीच्या वेळेला नागरिक उन्हाळा असल्याने बाहेर बसलेले असतांना आणि शतपावली करत असतांना ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण राडा पवन नगर पोलीस चौकीच्या मागील भागात घडला. यामध्ये वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. रिक्षांचे नुकसान झाले आहे. तक्रार दिल्यास पुन्हा गुंड येऊन त्रास देतील यामुळे याबाबत तक्रार देण्यास कुणीही पुढे आलेले नाहीत.