पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? 'या' नावाने असणार नवीन जिल्हा?

संस्कृतीचं आणि शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune) मोठमोठ्या कंपन्या आल्या आणि पुण्याची लोकसंख्याही वाढू लागली. वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुण्याचं विभाजन करण्याची मागणी भाजप आमदाराने केली आहे.   

राजीव कासले | Updated: May 15, 2023, 06:20 PM IST
पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? 'या' नावाने असणार नवीन जिल्हा? title=

पुणे :  राज्यातील सर्वात मोठी महापालिका म्हणून पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation) ओळख आहे.  पुणे महापालिकेत 34 गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर भौगोलिकदृष्ट्या देशातील सर्वात मोठी महापालिका अशी पुण्याची ओळख निर्माण झाली. वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुणे जिल्ह्याचे विभाजन करा अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगेंनी (MLA Mahesh Landage) केलीय. यासाठी आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना एक पत्रही लिहिलं आहे. पुणे जिल्ह्याचं विभागजन करुन नवीन जिल्ह्याचं नाव 'शिवनेरी' द्या (Shivneri) अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे. 

ठाणे (Thane) हा राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि पालघर (Palghar) जिल्हा अस्तित्वात आली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्या विभागली गेली. सध्या राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्ह्यात पुणे पहिल्या क्रमांकवर, ठाणे जिल्हाय दुसऱ्या क्रमांकवर तर मुंबई (Mumbai) उपनगर तिसऱ्या क्रमांकवर आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना असताना आमदार लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचं विभाजन करण्याची मागणी केली. नव्या जिल्ह्याला शिवनेरी असं नाव द्या, आम्हाला त्याचा सर्वात जास्त अभिमान वाटेल, असं आमदार लांडगे यांनी म्हटलंय.  

पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. यामध्ये हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी, मावळ, पुणे शहर यांचा समावेश होतो. पुणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवा शिवनेरी जिल्हा अस्तित्वात आल्या या जिल्ह्यात कोणते तालुके असतील पाहुयात. नवीन शिवनेरी  जिल्हा निर्माण झाला तर, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, मावळ या तालुक्यांसह पिंपरी-चिंचवड, देहू आळंदी, शिक्रापूरचा भाग यात येऊ शकतो. 

अशी झाली जिल्ह्यांची निर्मिती
भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून १ मे 1060 रोजी  26 जिल्ह्यांचा महाराष्ट्र अस्तित्वात आला. पण पुढे अनेक जिल्हे लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्याने प्रशासकीय कामातील नागरिकांची गैरसोय समोर येऊ लागली. त्यामुळे मोठ्या जिल्ह्यातून नवीन जिल्हा निर्मिती सुरू झाली. मात्र, त्यासाठी तब्बल 20 वर्षांचा कालखंड जावा लागला. लोकसंख्येच्या दृष्टीने काही जिल्ह्यांची विभागणी होऊन राज्यात नवीन 10 जिल्ह्यांची भर पडली. आता महाराष्ट्र 36 जिल्ह्यांचा झाला आहे. आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे.