'बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, वेळ पडली तर रुळ उखडून फेका'

या संपूर्ण दौऱ्यात राज ठाकरेंची वसईत एकमेव जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. 

ANI | Updated: May 1, 2018, 11:42 PM IST

वसई : महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झालीय. पालघरमधून त्यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केलीय. जिल्हा झाल्यानंतर पालघरला राज ठाकरेंची ही पहिलीच भेट ठरलीय. या संपूर्ण दौऱ्यात राज ठाकरेंची वसईत एकमेव जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. 

काय म्हटलंय राज ठाकरेंनी या सभेत... 

- महाराष्ट्रातल्या बंधु-भगिनींनो बेसावध राहू नका... राज ठाकरेंचं आवाहन

- चिमाजी अप्पांच्या भूमीत आपण जमलो आहोत. चिमाजी अप्पांचं शौर्य तुम्ही दाखवा 

- मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई - बडोदा एक्सप्रेस वे या प्रकल्पांसाठी आपल्या जमिनी द्यायच्या नाहीत

- रुळ टाकले जातील ते तुम्ही उखडून टाकल्या पाहिजेत... हे जे स्वप्न पाहतायत ते पूर्ण होऊ देऊ नका... तुम्ही नव्या महाराष्ट्राचं स्वप्न पाहा 

- हिंतेंद्र ठाकूरांवर बोलणं फारच छोटी गोष्ट 

- जगातल्या सगळ्या लढाया या जमिनीसाठी झाल्यात. आज कोकणातील मराठी माणूस, ठाण्यातील मराठी माणूस आपल्या जमिनी चार पैश्यांकरता फुकून टाकतोय. उद्या तुमच्या जमिनी जातील. इंच इंच जमीन विकली जाईल आणि आपल्याच राज्यात बेघर होऊ

- महाराष्ट्रात इथे पालघरमध्ये गुजराती पाट्या का लागतात? इथे बाहेरून येऊन राहिलेल्याना गुजराती पाट्या लागतात कशाला? 

- अस्मिता काय असते ते कर्नाटकाकडून शिका... प्रत्येक ठिकाणी फक्त कानडीतच पाट्या दिसतात... ठाण्यात, पालघरमध्ये गुजरातीमध्ये पाट्या का दिसतात?

- मराठी माणसाच्या मनगटातल्या ताकदीला काय झालं, असे बुळबुळीत का वागताय, कोणीही यावं मराठी माणसावर वरवंटा फिरवावा हे आपण का खपवून घेतोय 

- नाणारमध्ये प्रकल्प येणार आहे, हे कोकणातल्या आपल्या लोकांना माहीत नाही पण गुजरातच्या काही लोकांना नाणारमध्ये रिफायनरी येणार हे कसं कळतं? त्यांना जमिनी घ्या, मग प्रकल्प आल्यावर मोठ्या फायद्यासाठी विका हे कोण सांगत यांना? 

- तुम्हाला सगळ्यांना गृहीत धरायला लागलेत. तुमच्या मुलांच्या करता उत्तम शिक्षण नाही, आरोग्य व्यवस्था नाही, तुम्हाला नोकऱ्या मिळोत न मिळोत याचं या सत्ताधाऱ्यांना किंवा मागच्या सत्ताधाऱ्यांना काहीच घेणं देणं नाही. 

- भारतीय जनता पक्ष हे हिंदुत्वाच्या गप्पा मारतं, पण आझाद मैदानाच्या मोर्च्याच्या वेळेला जेंव्हा मुसलमानांनी पोलीस भगिनींवर हात टाकला, तेंव्हा त्याचा निषेध करणारा मोर्चा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढला होता, या अश्या मुसलमानांवर जी दहशत बसली ती आमच्यामुळे बसली

- बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या मुसलमानांचे लोंढेच्या लोंढे हे महाराष्ट्रात मोहल्ले तयार करत आहेत, ते काय करत आहेत, कुठून आलेत याचा पत्ता नाही, पण अश्या धोकादायक मोहल्यांविरोधात देवेंद्र फडणवीस कारवाई करत नाहीत 

- मोदी देशवासियांशी खोटं बोलत आहेत 

- भाजप कॅशलेस, डिजीटल इंडियाचा नारा देतं... मग, भाजपकडे निवडणूक लढवायला कॅश येते कुठून?

- जर कॅशलेस इंडिया आहे मग भारतीय जनता पक्षाकडे निवडणुका लढवायला,पैसे वाटायला कॅश कुठून येते 

- सध्या नोटांचा तुटवडा सुरु आहे, आणि यावर सरकारने उत्तर दिलं की नोटांची शाई संपली आहे, पण नोटा छापायचं काम सुरु आहे. शाई संपली अशी उत्तरं कशी देऊ शकता? हे काय वाण्याचं दुकान आहे का? कॅशलेस इंडियाचं काय झालं?

- मोदींसारखा माणूसघाणा पंतप्रधान पाहिला नाही... ना कुणाशी बोलायचं ना कुणाचं ऐकायचं... 

- भारतीय डॉक्टरांच्या विषयी लंडनमध्ये जाऊन अपमानास्पद विधानं करता, लाज नाही वाटत तुम्हाला आपल्याच माणसांबद्दल बाहेर जाऊन वाट्टेल ती विधानं करायला. पण राफेल विमानांच्या व्यवहाराविषयी का नाही बोलत?

मुख्यमंत्री म्हणाले १ लाख २० हजार विहिरी बांधल्या, बहुदा मुख्यमंत्री रस्त्यावरचे खड्डे पण विहिरी म्हणून मोजत असणार

- फडणवीस मोदी-शहांच्या हातातलं बाहुलं...

- बुलेट ट्रेनच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या जमिनी बळकावायच्या आणि १९६० साली जी मुंबई महाराष्ट्राला दीर्घ लढाईने मिळवली तिचा ताबा घ्यायचा हा यांचा डाव आहे

- नरेंद्र मोदी म्हणाले आख्ख्या देशात आम्ही वीज पोचवली, मग २०१४ च्या आधी आम्ही काय अंधारात होतो का? काय खोटं बोलता? देशातील विद्युतीकरणावरून मोदींची उडवली खिल्ली 

- महाराष्ट्रात ४ लाख शौचालयं बांधली असले फुटकळ दावे मुख्यमंत्र्यांनी केले, महाराष्ट्रात पाणी नाही तरी पण असले दावे मुख्यमंत्री करत आहेत   

- मोदी भारताचे नव्हे, गुजरातचे पंतप्रधान - राज ठाकरे

- मुंबई - बडोदा एक्सप्रेस वे बांधतायत... भारतामध्ये दुसरी राज्य नाहीत?

- आजचा दिवस... हाच तो १ मे... याच दिवशी १९६० महाराष्ट्राचा मंगल कलश आपल्या हातात आला... गुजरातला मुंबई हवी होती... आताही तेच सुरू आहे... आता तुम्ही ठरवा याला बळी पडायचंय किंवा नाही... 

- देवेंद्र फडणवीस हा काय मुख्यमंत्री आहे? बसवलेला मुख्यमंत्री... स्वत:च्या ताकदीवर आलेला मुख्यमंत्री नाही हा.... आमचा मुख्यमंत्री काय निर्णय घेणार तर मोदी, शाह सांगणार तोच... दुसरा निर्णय घेण्याची हिंमत आहे का?

- राज्यात आरक्षणाची स्पर्धा सुरु आहे

- चार टक्के सरकारी नोकऱ्यांसाठी भांडत आहेत... खाजगी क्षेत्रात आरक्षण नाही

- आपणच शिवरायांचा विचार मारायला निघालोत

- आपल्यातील जातीयवादामुळे बाहरेच्यांचं फावतंय 

राज ठाकरे ट्विटरवर 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे फटकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. फेसबुक या सोशल मीडियानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरही प्रवेश केला आहे. आपले अधिकृत ट्विटर हँडल @RajThackeray या नावे त्यांनी सुरु करताच अनेक फॉलोअर्सनी राज ठाकरेंना फॉलो केले आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राज ठाकरेंना किती मोठ्या प्रमाणावर फॉलो करायला सुरुवात केलीय. पहिल्यात दिवशी राज ठाकरेंनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ट्विटरच्या माध्यमातून दिल्या. तूर्तास राज ठाकरे यांनी कोणतेही ट्विट केलेले नाही. तरीही त्यांचे फॉलोअर्स वाढतच चालले आहेत ही वस्तुस्थिती आहे. अशात राज ठाकरे यांचे पहिले ट्विट काय असेल? तसेच आगामी काळात राज ठाकरे कोणकोणत्या विषयांवर ट्विट करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.