'बांगलादेशी हिंदूंचं स्थलांतर नको, त्यांना..'; भिडेंची मागणी! म्हणाले, 'भारत सरकारमध्ये..'

Sambhaji Bhide Sangli Press Conference: प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना संभाजी भिडेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं यामध्ये त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 18, 2024, 01:47 PM IST
'बांगलादेशी हिंदूंचं स्थलांतर नको, त्यांना..'; भिडेंची मागणी! म्हणाले, 'भारत सरकारमध्ये..' title=
पत्रकारांशी बोलताना केलं विधान (फाइल फोटो)

Sambhaji Bhide Sangli Press Conference: बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार विरोधात 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार, अशी घोषणा शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली. यावेळेस बोलताना संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंड भरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. तसेच भिडेंनी मराठा आरक्षणासंदर्भातही सूचक विधान केलं. (येथे क्लिक करुन वाचा दिवसभरातील लाइव्ह अपडेट्स)

CM शिंदे कुशल, हिंमतवान, देशभक्त

संभाजी भिडे यांनी कुशल, हिंमतवान, देशभक्त अशी विशेषणांचा वापर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केलं. भिडेंनी समस्याची पालवी महाराष्ट्रला फुटत आहे, समाजमनाचे मनोगत मांडताना शिवप्रतिष्ठान यामध्ये सहभागी आहे असं म्हटलं. या हिंदुस्थानचा जनप्रवाह घेऊन महाराष्ट्रचा जीवनगडा मुख्यमंत्री शिंदे हाकत आहेत. कुशल, हिंमतवान, देशभक्त, लोकहीतासाठी झटणारा नेता महाराष्ट्रचा संसार हाकत आहे," असं भिडे म्हणाले. 

भारत सरकारमध्ये तशी धमक आहे की बांगलादेशमध्ये...

"पाकिस्तानचा अविभाज्य भाग म्हणून बंगलादेशचा जन्म झाला. त्या बांगलादेशच्या पंतप्रधान आज हिंदुस्थानकडे आश्रयाला आल्या, दुसरीकडे कुठे गेल्या नाहीत. हसीना शेख भारतात आल्या ते योग्य आहे," असं संभाजी भिडे म्हणाले. एवढ्यावरच न थांबता भारत सरकारने पुढाकार घेऊन शेजारच्या देशात हिंदूंविरोधात चालेला अत्याचार थांबवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असंही संभाजी भिडे म्हणाले. "बांगलादेशमध्ये चाललेला नंगा नाच बंद झाला पाहिजे. जसे बटन दाबल्यावर दिवा बंद होतो, तसं काम या समस्येबद्दल केलं पाहिजे," असं संभाजी भिडे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "भारताच्या सरकारमध्ये तशी धमक असून तसं काम त्यांनी करावं," असंही भिडे यांनी म्हटलं. 

हिंदू राजकारण्यांनी पेटून उठायला हवं

"बांगलादेशमधील हिंदू लोकांचे स्थलांतरण अजिबात करता कामा नये. त्यांना बांगलादेशमध्येच सुरक्षा मिळायली हवी. सर्व हिंदू राजकारणी या गोष्टी घडल्यावर पेठून उठायला हवेत," असं संभाजी भिडे म्हणाले. 

आरक्षण कुठे घेऊन बसलाय?

संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातही भाष्य केलं. "मराठा आरक्षण कळीचा मुद्दा आहे. पण वाघ आणि सिंहाने मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचं आहे. आरक्षण कुठे घेऊन बसलाय?" असं विधान संभाजी भिडेंनी केलं. मागील काही काळापासून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून मराठा आंदोलक महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेताना दिसत आहेत.