छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका... नाशिकच्या काळाराम मंदीरात मंत्रोच्चारापासून रोखल्याने संभाजी राजेंच्या पत्नी संतापल्या..

Sanyogeetaraje Chhatrapati Insta Post : नाशिकच्या काळाराम मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांच्यासोबत घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. मंदिरात महंतांनी वेदोक्त मंत्रांचा उच्चार करण्यापासून रोखल्याने संयोगिताराजे यांनी संताप व्यक्त केला आहे

Updated: Mar 31, 2023, 01:16 PM IST
छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका... नाशिकच्या काळाराम मंदीरात मंत्रोच्चारापासून रोखल्याने संभाजी राजेंच्या पत्नी संतापल्या.. title=

Kalaram Temple Nashik News: नाशिकच्या (Nashik) काळाराम मंदिरातून (Kalaram temple) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काळाराम मंदिरात छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती (sanyogeetaraje chhatrapati) यांना वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास महतांनी विरोध केल्याच्या खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर छत्रपतींनी जी मंदिरे वाचवली तिने छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करु नका अशा शब्दात संयोगिताराजे छत्रपती यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. रामनवमीच्या दिवशी संयोगिताराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे. 

नाशिकच्या काळाराम मंदिरातील महंतांनी दर्शनासाठी आलेल्या संयोगिताराजे यांच्यासमोर पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला अशी पोस्ट छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीता राजे छत्रपती यांनी केली आहे. पूजेदरम्यान काळाराम मंदिरातील महंतांनी संयोगीताराजे यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला होता. त्यावेळी संयोगिताराजे छत्रपती यांनी महंतांना खडे बोल सुनावत रामरक्षा म्हटली. त्यामुळे आता राजर्षी शाहू महाराज यांच्या काळातील वेदोक्त वाद आजही सुरु आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे काळाराम मंदिरातील महंतांच्या भूमिकेवरुन प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संयोगिताराजे छत्रपतींसोबत काय घडले?

"हे श्रीरामा, स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे... हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे..
आपण सर्वजण देवाची लेकरे….आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी?या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते. त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले. नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला.अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच... तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे… अजूनही खूप प्रवास बाकी आहे...अजून खूप चालावे लागणार आहे… हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे!," असे संयोगिताराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, संयोगिताराजे यांच्यासोबत घडलेल्या प्रकारामुळे सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळली आहे. मराठा क्रांती मोर्चाने फेसबुक पोस्टद्वारे आपला रोष व्यक्त केला आहे. सौ. संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांचा काळा राम मंदिरातील महंतांनी अपमान केला या घटनेचा जाहीर निषेध म्हणत मराठा क्रांती मोर्चाने त्यांनी दिलेल्या प्रत्युत्तराचे कौतुक केले आहे.