शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, संवाद साधत सरसकट कर्ज माफीचे सूतोवाच

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असला तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी पुन्हा एकदा राज्यात दौरा सुरु केला आहे. 

Updated: Nov 14, 2019, 07:10 PM IST
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, संवाद साधत सरसकट कर्ज माफीचे सूतोवाच  title=

नागपूर : महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात सध्या सत्तासंघर्ष सुरुच आहे. शिवआघाडीची  पहिली बैठक मुंबईत सुरु आहे. सत्तास्थापनेचा तिढा कायम असला तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी पुन्हा एकदा राज्यात दौरा सुरु केला आहे. त्यांनी आज शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकांची पाहणी केली आणि त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दर हेक्टरी मदतीसह सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्ज माफीचे सूतोवाच केले आहे. ते नागपूर जिल्ह्यातील अत्यंत दूरस्थ "तीतूर" गावात शेतकऱ्यांशी संवाद साधत होते.

यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या पवार यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळी शेतकऱ्यांनी सरसकट कर्ज माफीचा विषय छेडला असता शरद पवार यांनी जुनी कर्जमाफी झालीच कुठे, असा प्रश्न विचारत शेतकऱ्यांमध्ये आता बँकांचे कर्ज फेडण्याच ताकत उरलेली नाही, असे मत व्यक्त केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरून बोजा कमी करायचे असेल तर सरकारने थेट बँकेत पैसे भरले पाहिजे आणि त्या पद्धतीने सरसकट कर्ज माफी केली पाहिजे, असे पवार म्हणालेत. 

आपण शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. केंद्र सरकारकडे तशी मागणी करणार असल्याचे ही पवार यांनी यावेळी सांगितले. निवडणूक होऊनही राज्यात सत्ता स्थापन झालेली नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट असली तरी मोठी नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे केंद्र सरकारला मदत करावीच लागेल, असे पवार म्हणालेत. शेतकऱ्यांना दर हेक्टरी मदत आणि सरसकट कर्जमाफी असे दुहेरी लाभ मिळावे यासाठी आपले प्रयत्न असतील असे शरद पवार यांनी यांनी म्हटले आहे.

विदर्भात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बँक किंवा क्रेडिट सोसायटीकडून घेतलेली आर्थिक मदत सरकारने पूर्णपणाने भरावी, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. नरखेड तालुक्यातील खापा आणि नायगांव (ठाकरे) या गावांमधील संत्र्याच्या बागांच्या नुकसानाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी पवार यांनी संवाद साधला. नागपूरमधील  काटोल विधानसभा क्षेत्रातील ओल्या दुष्काळाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान चारगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही, कोणी पाहणी करायला आले नाही, पिकाला भाव नाही, अशा व्यथा हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मांडल्या.