'महाराष्ट्रात याआधी असले...', एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर शरद पवारांचं मोठं विधान; 'इच्छा नसतानाही...'

एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा एकदा भाजपात (BJP) प्रवेश कऱणार आहे. भाजपाची साथ सोडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. पण आता ते शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून स्वगृही परतत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Apr 21, 2024, 03:05 PM IST
'महाराष्ट्रात याआधी असले...', एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर शरद पवारांचं मोठं विधान; 'इच्छा नसतानाही...' title=

भाजपाची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात सामील झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा स्वगृही परतणार आहेत. पक्षात होणारा अन्याय तसंच इतर कारणांचा दाखला देत एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. भाजपा सोडताना त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. पण आता एकनाथ खडसे पुन्हा त्याच भाजपा पक्षात परतणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याने शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यादरम्यान शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकनाथ खडसे नाईलाजास्तव भाजपात जात असल्याचा दावा केला आहे. 

"सध्या जितके व्यक्तिगत हल्ले केले जात आहेत, तितके याआधी महाराष्ट्रात होत नव्हते. यामुळे अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. कदातिच हीच अवस्था एकनाथ खडसेंची झाली असावी. त्यामुळे नाईलाजाने निर्णय घेतला असावा असं मला वाटत आहे," असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. 

एकनाथ खडसे यांनी स्वत: आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मी दिल्लीत भेट घेतली असता भाजपात प्रवेश करावा ही इच्छा व्यक्त केली होती. येत्या 15 दिवसाच्या आत दिल्ली येथे केंद्रीय नेतृत्वांच्या हातून माझा भाजपात प्रवेश होणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं. 

भाजपमध्ये येण्यासाठी माझा कधीही प्रयत्न नव्हता. पण भाजपात काही जुने नेते पदाधिकारी आहेत, त्यावेळी चर्चा होताना विषय निघाला की तुम्ही भाजपात आलं पाहिजे. माझी राजकीय परिस्थिती बघितल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही हे त्यांना सांगितलं होतं, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली होती. 

"हा माझा निर्णय आहे. मला वाटलं की मी स्वगृही परत गेलं पाहिजे, भाजपा हे माझं घर आहे. या घराच्या पायाभरणीपासून काही ना काही प्रकारचं योगदान मी दिलं आहे. 40 ते 42 वर्षं मी त्या जुन्या घरामध्ये होतो. काही कारणांमुळे, माझ्या नाराजीमुळे घराच्या बाहेर पडलो आणि आता ती माझी नाराजी दूर झाल्यामुळे मी पुन्हा माझ्या घरात येत आहे, असं सांगत त्यांनी भूमिका मांडली होती.