महाविकास आघाडीची ही शेवटची 'वज्रमूठ सभा', अजितदादांबाबत शिंदे गटाचा मोठा दावा

Shinde Group on Maha Vikas Aghadi Sabha : मुंबईत महाविकास आघाडीची सभा झाली. मात्र, ही आघाडीची वज्रमूठ शेवटची असेल, असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. 'वज्रमूठ' सभेनंतर विरोधक भाजप आणि शिंदे गटाकडून येणाऱ्या प्रतिक्रियावरुन राजकीय वातावरण आणखी तापणार याची झलक दिसून आली आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: May 2, 2023, 02:01 PM IST
महाविकास आघाडीची ही शेवटची 'वज्रमूठ सभा', अजितदादांबाबत शिंदे गटाचा मोठा दावा title=

Shinde Group on Maha Vikas Aghadi Sabha : मुंबईत झालेली महाविकास आघाडीची सभा ही शेवटची होती. नेत्यांच्या भाषणांमध्ये काही दम दिसला नाही, यानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार नाही, असा दावा शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्याचवेळी ते म्हणाले अजित पवार महाविकास आघाडीच्या सभेत शरीराने असतील, ते मनातून कुठे आहेत येत्याचार दिवसात कळेल, असे सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलेय.  'वज्रमूठ' सभेनंतर विरोधक भाजप आणि शिंदे गटाकडून येणाऱ्या प्रतिक्रियावरुन राजकीय वातावरण आणखी तापणार याची झलक दिसून आली आहे.

सोमवारी 1 मे 2023 रोजी मुंबईत महाविकास आघाडीची सभा झाली. संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या सभेवर जोरदार टीका केली आहे. मुंबईत झालेली महाविकास आघाडीची सभा ही शेवटची होती, यानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार नाही, असे विधान करताना शिरसाट म्हणाले, या सभेत नागरिकांना आणि स्टेजवर असलेल्या लोकांना बोर झाले होते. तसेच या सभेत कुठलाही दम नव्हता, इतर नेत्यांच्या भाषणामध्ये देखील काही दम दिसला नाही, त्यांनी पुढच्या सभेची घोषणा केलेली नाही. यामुळे महालिकास आघाडीची वज्रमूठ सभा ही शेवटची होती. यानंतर सभा होणार नाही, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.‌

अजित पवार यांबद्दल संजय शिरसाट यांनी सूचक विधान केल्याने पुन्हा एकदा अजित पवार यांच्याबाबत संभ्रम आसल्याचे त्यांनी सूचित करताना म्हटले महाविकास आघाडीच्या सभेत मनापासून नाहीत तर ते शरीराने असतील आणि ते मनातून कुठे असेल काही दिवसात दिसून येईल,  शिरसाट म्हणाले. त्याचवेळी अजित पवार आले तर स्वागतच आहे, असे संदीपान भुमरे म्हणाले. त्यामुळे शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या विधानाने चर्चांना उधाण आले आहे.

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

 या सभेत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, चीन आपल्या देशाचा भूगोल बदलतोय आणि आपले नाकर्ते सरकार देशाचा इतिहास बदलताहेत. राज्याची अवहेलना आमि मुंबईचे वस्त्रहण थांबवण्यासाठी आता ही अशी एकच वज्रमूठ आणि त्या वज्रमुठीचा एकच ठोसा असा मारा की पहिली महापालिका येऊ द्या, विधानसभा येऊ द्या, नाहीतर लोकसभेबरोबर तिन्ही निवडणुका घ्या. तुम्हाला आम्ही भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही, असे एल्गार ठाकरे यांनी यावेळी केला.

आपले सरकार गेले आणि शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईची सोन्यासारखी जमीन बुलेट ट्रेनच्या घशात टाकली. शिवाजी महाराज यांनी सूरत लुटली होती ती इंग्रजांची वखार स्वराज्यासाठी लुटली होती. पण त्याहीपेक्षा भयानक मोठी मुंबईची, महाराष्ट्राची लूट हे  भांडवलदारी वृत्तीचे सरकार करत आहे, असा हल्लाबोल ठाकरे यांनी यावेळी केला.