संजय राऊत यांचा बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल, '50 खोके घेऊन गेले आहात तर सुखी राहा'

 ​Maharashtra Political Crisis : बंडखोरांना महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला.  

Updated: Jul 9, 2022, 03:13 PM IST
संजय राऊत यांचा बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल, '50 खोके घेऊन गेले आहात तर सुखी राहा' title=
संग्रहित छाया

नाशिक : Maharashtra Political Crisis : बंडखोरांना महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. त्याचवेळी त्यांनी शिवसेना बंडखोरांवर सडकून टीका केली. गुलाबराव पाटील यांचा उल्लेख जुलाबराव असा करत 50 खोके आता पचणार नाहीत, राऊत म्हणाले. शिवसेना स्वार्थासाठी सोडलेल्यांना रस्त्यात शिवसैनिक फिरु देणार नाहीत, असा इशाराही त्यांनी जाहीर सभेत दिला.

50 खोके घेऊन गेले आहात तर सुखी राहा. गुलाबराव जुलाबराव होतील आणि 40 जणांना थोड्याच दिवसात जुलाब होतील, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली. शिवसेना सोडताना तुम्ही 10 कारणे दिलीत. मात्र, ही कारणं चुकीची आहेत. तुम्ही भाजपचे झालात. तुम्हाला जायचे होते, म्हणून गेलात. कारण शोधत आहात. आताचे मुख्यमंत्री हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला.

शरद पवार, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेतून बाहेर पडलो. बडव्यांमुळे आम्ही भडवे  बाहेर पडलो. संजय राऊतमुळे बाहेर पडलो. चिमणराव म्हणतात, गुलाबराव यांनी जळगावात शिवसेना वाढू दिली नाही. त्यांच्याकडून सांगितली जाणारी सर्व कारणे बोगस आहेत. खोकेबाजीमुळे आता आपण ठोकेबाजीच्या बाजुने उभे राहिले पाहिजे, असा हल्लाबोल केला.

भाजपने हिंदुत्वाच्या नावावर युती तोडली तेव्हा 40 आमदार भाजपला मिळाले. 2019 मध्ये भाजपने शब्द पाळला असता तर मुख्यमंत्री शिंदेच झाले असते. मला माझ्या बायकोला, मुलीला सर्वांना नोटीस दिली. मात्र मी मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. पक्षाच्या वा ठाकरेंच्या पाठीत खुपसणार नाही. भुजबळ, राणे सर्व गेले मात्र ते हरले, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.

शिवसैनिकाला कोणीही पळवून नेऊ शकत नाही. 40 आमदार म्हणजे शिवसेना नाही. दोन-पाच खासदार इकडे तिकडे गेले म्हणजे शिवसेना हलली असे होत नाही. अजूनही 100 आमदार आणि 25 खासदार निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणात आहे. शिवसेना आमच्याच बापाची आहे, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.

ठाकरे आजारी असतांना मोगलांशी हातमिळवणी केली हा इतिहास आहे. बाळासाहेबांचा आत्मा पाहतोय वरुन ,अशी अनेक आक्रमण पाहिली
छत्रपतींचे वंशज आहोत आम्ही. संपूर्ण देशातून पाठिंबा मिळतोय आम्हला.  हिटलरचा अंत झाला. भलेभले गेले. तुम्ही कोण? भारतीय सेना देशाचे रक्षण करतेय तर शिवसेना महाराष्ट्राचे राखण करतेय, असे ते म्हणाले.

 मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात महाराष्ट्रात प्रत्येकाला संभाळले. पोराबाळांचे जीव वाचविले. भेटत नाही असे आरोप करत आहात. पक्षप्रमुख आजारी पडले, त्याचा फायदा घेऊन बाहेर पडले. आमचा धनुष्यबाण पंचप्राण आहे. माझा प्राण जाईल मग धनुष्यबाण जाईल. आवाज सुद्धा शिवसेनेचा राहील. भाजपने शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला ते होत नाही, हे पाहून ईडी आणि सीबीआय सर्व यंत्रणा वापरली. आमदार फोडले, पण शिवसेना नाही. या आमदारांनी सेनेशिवाय निवडून दाखवावे, असे थेट आव्हान संजय राऊत यांनी दिले.