Thane Accident: धावत्या कारमध्ये लोखंडी सळई आरपार घुसली; ठाण्यातील अंगावर काटा आणणारा अपघात

Thane Accident News: ठाण्यात भर रस्त्यात एक विचित्र अपघात झाला आहे. ब्रीजवरुन लोखंडी सळई कोसळून थेट कारच्या छतामधून आर पार घुसली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 6, 2023, 01:07 PM IST
Thane Accident: धावत्या कारमध्ये लोखंडी सळई आरपार घुसली; ठाण्यातील अंगावर काटा आणणारा अपघात title=

Thane Accident News : धावत्या कारमध्ये लोखंडी सळई पडली. ही सळई कारच्या छतातून आर पार आत घुसली. ठाण्यात हा विचित्र अपघात घडला आहे. ठाण्यात मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. यावेळी मेट्रोच्या ब्रीज खालून ही कार जात असताना हा प्रकार घडला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे वाहनचालक भयभित झाले आहेत. 

ठाण्यातील तीन हात नाका येथे हा विचित्र अपघात घडला आहे. ठाण्यातील तीन हात नाका तसेच आसपासच्या परिसरात  मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोच्या ब्रीजखालून वाहनांची सतत वर्दळ चालू असते. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास अचानक वरून एक सळई खालून जाणाऱ्या कार मध्ये आरपार घुसली. सुदैवाने कारचालकाला कुठलीही गंभीर दुखापत झालेली नाही. वाहतूक पोलिसांनी सुद्धा तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक कोंडी होण्याआधीच ती कार तिथून बाजूला केली.मात्र, या घटनेमुळे मेट्रो काम सुरू असताना घेण्यात येणार सुरक्षा सक्षम आहे का? जर मोठी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण असा सवाल ठाणेकर उपस्थित करत आहेत.

ठाणे ते सीएसएमटी मेट्रो

ठाणे ते सीएसएमटी मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार आहे. ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते सीएसएमटी अशी मेट्रो सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक असलेला वडाळा ते सीएसएमटी हा मेट्रो 11 प्रकल्प मूळ मेट्रो 3 ची उभारणी करणा-या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे वर्ग करण्यात आला आहे. मुंबईशी जोडण्यासाठी कासारवडवली-घाटकोपर-वडाळा या मेट्रो 4 प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. याच मार्गिकेला मेट्रो 4 अ प्रकल्पाद्वारे गायमुख ते कासारवडवली अशी जोडही दिली जात आहे. त्यातून गायमुख ते वडाळा तसेच मेट्रो 11 असलेल्या वडाळा ते सीएसएमटी मार्गाला जोडला जाणार आहे.यामुळे थेट आता ठाणे ते सीएसएमटी मेट्रो प्रवास शक्य होणार आहे. यासाठी साडे आठ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

मुंबईहून फक्त अर्ध्या तासात कर्जत, कसारा गाठता येणार

मुंबईबाहेरची शहरं गाठण्यासाठीची मोठी कसरत आता टळणार आहे. कर्जत, कसारा, पनवेल, पालघर फक्त अर्ध्या तासात गाठता येणार आहे. तेही मेट्रोने. महामुंबईतल्या वाहतुकीला वेग देण्यासाठी रॅपिड ट्रान्सपोर्ट अर्थातच जलद मेट्रोची चाचपणी झाल्याचं समजते. कर्जत, कसारा, पनवेल, पालघर, ठाणे-डोंबिवली ही लांब अंतरावरची स्टेशन्स मेट्रोने जोडण्याची शक्यता आहे.