दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात

१७ लाख ८१३ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार 

Updated: Feb 28, 2019, 06:31 PM IST
दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरवात होते आहे. राज्यातले १७ लाख ८१३ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पन्नास हजारांनी कमी आहे. नवीन अभ्याक्रमानुसार होणारी ही पहिलीच परीक्षा आहे. तर जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेत देखील यंदा विशेष विद्यार्थी म्हणून तीन विद्यार्थ्यांना सुविधा देण्यात आल्या असून त्यापैकी एकाला लॅपटॉप देण्यात आलेला आहेत. तर अंध, मूक, कर्णबधीर दोन विद्यार्थिनींना दुभाषक आणि लेखनिक देण्यात आलेला असल्याची माहिती बोर्डानं दिली आहे.

विज्ञान, गणितासाठी मात्र नववीच्या अभ्यासक्रमावर २० टक्के प्रश्न विचारण्यात येणार आहे. दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होत आहे. राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळपत्रक याआधीच जाहीर झालं आहे. दहावीचा परीक्षेचा पहिला पेपर १ मार्च रोजी होणार असून २२ मार्चला परीक्षा संपणार आहे.