तुम्ही अशा ठिकाणी बनवलेली 'मिठाई' तर खात नाहीत ना?

तुम्ही जी मिठाई खाताय ती मिठाई कुठं बनते याची कल्पना आहे का? नसेल तर एकदा खात्री करून घ्या...

Updated: Jul 6, 2019, 08:03 PM IST
तुम्ही अशा ठिकाणी बनवलेली 'मिठाई' तर खात नाहीत ना? title=

आतिष भोईर, झी २४ तास, कल्याण : तुम्हाला मिठाई खाण्याची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी.. तुम्ही जी मिठाई खाताय ती खाण्याअगोदर ती कुठं बनवली जाते याची चौकशी करा. कल्याणमध्ये अशाच एका मिठाईच्या घाणेरड्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आलाय.

तुम्ही जी मिठाई खाताय ती मिठाई कुठं बनते याची कल्पना आहे का? नसेल तर एकदा खात्री करून घ्या... कारण कल्याणमध्ये एका डर्टी कारखान्यातल्या डर्टी मिठाईचा पर्दाफाश करण्यात आलाय. कल्याण पूर्वेच्या सूचक नाक्यावरील पठाण चाळीत हा घाणेरडा कारखाना आहे. या कारखान्यात घाणेरड्या भांड्यात सोनपापडी बनवली जात होती. शिवाय शेंगदाणा लाडूही बनवण्याचं काम सुरू होतं.

ज्या भांड्यात ही मिठाई बनवली जात होती त्या भांड्याला तुम्ही हातही लावू शकणार नाही. मिठाईच्या कारखान्यात कुत्र्यांचा वावर होता. नाल्याजवळ हा कारखाना असल्यानं दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं होतं.

दोनच दिवसापूर्वी कल्याणमधील वडापाव खाल्ल्यानं काही जणांना विषबाधा झाली होती. त्यानंतर आता डर्टी मिठाईच्या कारखान्याचा पर्दाफाश झालाय. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यात अशा घाणेरड्या वातावरणात खाद्यपदार्थ तयार केलेल जातात. त्यामुळं बाहेरचे पदार्थ खाताना ते कुठं तयार झालेत याबाबत शंभरवेळा खात्री करून घ्या...