Unlock : अनलॉकचे काय आहेत नवीन नियम, वाचा

राज्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम असणार आहेत. 

Updated: Aug 2, 2021, 09:26 PM IST
Unlock : अनलॉकचे काय आहेत नवीन नियम, वाचा title=

मुंबई : राज्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम असणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे. तसेच उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. पण नागरिकांनी काटेकोरपणे नियम पाळण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

1. सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ पर्यंत सुरु राहणार आहेत.
2. रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहणार आहेत.
3. सर्व सार्वजनिक उद्याने आणि मैदाने ही व्यायाम, चालणे, धावणे आणि सायकलिंगसाठी खुले करण्यात आले आहेत.
4. सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु होतील. प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
5. जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु ठेवता येऊ शकतात ती तशी सुरु ठेवण्याची सुचना देण्यात आली आहे.
6. सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.
7. जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांना एसी बंद ठेवून सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येणार आहे. पण शनिवारी दुपारी 3 पर्यंत आणि रविवारी ते पूर्णपणे बंद राहणार आहेत.
8. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स हे बंदच राहणार आहेत. यात कोणतीही सूट दिलेली नाही.
9. राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे बंदच राहतील.
10. शाळा, महाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल.
11. सर्व उपाहारगृहे 50 टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरु ठेवता येईल.
12. रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही.
13. गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभ, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, निदर्शन मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

मास्क वापरणे, सुरक्षित अंतर यासारखे कोरोना प्रतिबंधक नियम सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग कायदा, आणि भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल.