Viral Video: गरम तव्यावर बसून शिव्या घालणाऱ्या बाबानंतर आता पाण्यावर तरंगणारा बाबा चर्चेत

Viral Video: तब्बल अर्धा तास हे बाबा पाण्यावर तरंगत राहिले. गावकऱ्यांनी या तरंगणाऱ्या बाबाचा मोबाईल फोनवर व्हिडिओ रेकॉर्ड केला. याचे काही व्हिडीओ झी 24 तासला प्राप्त झाले आहेत. बाबांसोबत एक महिला देखील पाण्यावर आधर तरंगतांना दिसत आहे.

Updated: Apr 3, 2023, 05:46 PM IST
Viral Video: गरम तव्यावर बसून शिव्या घालणाऱ्या बाबानंतर आता पाण्यावर तरंगणारा बाबा चर्चेत title=

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली :  गरम तव्यावर बसून शिव्या घालणाऱ्या बाबानंतर आता पाण्यावर तरंगणारा बाबा चर्चेत आला आहे. हिंगोलीतील (Hingoli) हा बाबा हात पाय न हलवता पाण्यावर तरंगत आहे. अनेक जण याला चमत्कार समजून बाबाच्या दर्शनाला येत आहेत. तर, हा योग क्रियेचा एक प्रकार असल्याचे देखील म्हंटले जात आहे (Viral Video).  

बाबा पाण्यावर तरंगतांना दिसतोय

हिंगोली जिल्ह्यात हा पाण्यावर तरंगणारा बाबा चर्चेत आहे. हिंगोली तालुक्यातील धोतरा येथे भागवत सप्ताह सुरू आहे. भागवताचार्य हरिभाऊ राठोड महाराज हे भागवत करत आहेत. ते पाण्यावर अधांतरी राहू शकतात असा दावा त्यांनी भागवत करतांना केला होता. याचे प्रात्यक्षिक या बाबांनी गावातील जाधव यांच्या शेतातील भल्या मोठ्या विहिरीत करून दाखविले. 

तब्बल अर्धा तास हे बाबा पाण्यावर तरंगत राहिले. गावकऱ्यांनी या तरंगणाऱ्या बाबाचा मोबाईल फोनवर व्हिडिओ रेकॉर्ड केला. याचे काही व्हिडीओ झी 24 तासला प्राप्त झाले आहेत. बाबांसोबत एक महिला देखील पाण्यावर आधर तरंगतांना दिसत आहे. या क्रियेला "पद्मासन" असे म्हटले जात असल्याचे गावकर्यांनी सांगितले. याला गावकरी मात्र चमत्कार समजू लागले आहेत. याबाबत अनेकजण आश्चर्य देखील व्यक्त करत आहेत. 

गरम तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद देणारा बाबा

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी इथल्या भोंदूबाबाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला होता. तापलेल्या तव्यावर बसून धूम्रपान करत हा भोंदूबाबा भक्तांना शिवीगाळ करत होता. या शिव्यांना भक्त बाबांचा आशिर्वाद समजतात. आपल्याला दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा या बाबानं केला आहे. या भोंदूबाबाचा व्हिडीओ समोर येताच झी २४ तासची टीम त्याच्या मठात पोहचली. मात्र मठाला टाळं लागलं होतं. भोंदूबाबाच्या मठात काम करणारे त्याचे भक्त उपस्थित होते. झी 24 तासनं या बाबाचा समाचार घेतल्यानंतर बाबानं आजच्या दरबाराला दांडी मारली. बाबाचे भक्त मात्र बाबा तीर्थयात्रेला गेल्याचा दावा भक्तानी केला.