राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होणार? शिक्षणमंत्र्यांनी घेतला आढावा

राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत  

Updated: Oct 22, 2021, 06:30 PM IST
राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होणार? शिक्षणमंत्र्यांनी घेतला आढावा title=

मुंबई : राज्यात कोरोनाची (Corona Cases) दुसरी लाट (Corona Second Wave) ओसरत असून दैनंदिन रुग्णसंख्येतही घट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 8 ते 12 चे वर्ग सुरु झाले असून कोरोनाचे नियम पाळत महाविद्यालयांनाही परवानगी देण्यात आली आहे. आता राज्यात सरसकट पहिलीपासून शाळा सुरू करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.

राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज सर्व जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. याबाबत वर्षा गायकवाड लवकरच मंत्रीमंडळ आणि टास्क फोर्सबरोबरही चर्चा करणार आहेत. 

आज वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सुरू असलेल्या शाळांबाबतचा आढावा घेतला. राज्यात शाळा सुरू होऊन 3 आठवडे झाले आहेत. या तीन आठवड्याचा अनुभव लक्षात घेता राज्यात पहिली ते चौथीच्या शाळा सुरू कराव्यात अशी भूमिका राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मांडली. सध्या राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत.

त्यानंतर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर मांडणार आणि टास्क फोर्सशी चर्चा करणार असून त्यानंतर राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय होणार आहे.