मोठी बातमी! टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्रींचं अपघाती निधन

पालघर येथे अपघातात सायरस मिस्त्री यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे

Updated: Sep 4, 2022, 04:49 PM IST
मोठी बातमी! टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्रींचं अपघाती निधन title=

Cyrus Mistry Death:. टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे अपघातीन निधन झालंय. पालघरमध्ये सायरस मिस्त्री यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी अपघातात त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

कसा झाला अपघात?

दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पालघर येथील सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत असलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

टाटा समूह आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वाद काय होता?

शापूरजी पालनजी या उद्योगघराण्याचे वारसदार असलेले सायर मिस्त्री यांना ऑक्टोबर 2016 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2012 मध्ये त्यांनी टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती. फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांना टाटा सन्सच्या संचालक पदावरून तसेच समूहातील अन्य कंपन्यांवरून त्यांना हटवण्यात आलं.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टीविरोधात मिस्त्री यांनी 2017 मध्ये राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मुंबई पीठाकडे दावा दाखल केला. जुलै 2018 मध्ये न्यायाधिकरणाने त्यांचा दावा फेटाळून लावला. त्यानंतर पुन्हा ऑगस्ट 2018 मध्ये अपील न्यायाधिकरणाकडे मिस्त्री यांनी धाव घेतली होती.

त्यानंतर न्यायमूर्ती एस. जे. मुखोपाध्याय यांच्या दोन सदस्यीय अपील न्यायाधिकरणाने जुलैमध्ये दोन्ही पक्षांचे युक्तिवादानंतर  18 डिसेंबरला अंतिम निकाल दिला. रतन टाटा यांचे मिस्त्री यांच्याशी वर्तन अन्यायकारक होते, असंही न्यायाधिकरणाने निकालात नमूद केलं होतं. त्यानंतर टाटा सन्सची सर्व सुत्रे मिस्त्री यांच्या हाती येणार होती.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने आपल्या 26 मार्च 2021 च्या निकालात नॅशनल कंपनी लॉ अपील ट्रिब्युनल (एनसीएलएटी) चा डिसेंबर 2019चा आदेश बाजूला ठेवला होता, ज्याने सायरस मिस्त्री यांना टाटा सन्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष म्हणून बहाल केले होते. न्यायालयाने 26 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने टाटा समूहाच्या बाजूने निर्णय देताना सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या प्रमुख पदावरून हटवण्याचा निर्णय कायम ठेवला.