अजित पवार यांचा पारा चढला, मंत्र्यांनाच दिली तंबी!

राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा पारा एकदम चढला. त्याला कारणही तसेच होते. 

Updated: Jan 21, 2021, 08:40 AM IST
अजित पवार यांचा पारा चढला, मंत्र्यांनाच दिली तंबी!  title=
Pic Courtesy: ANI

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा पारा एकदम चढला. त्याला कारणही तसेच होते. अनेक मंत्र्यांनी मंत्रीमंडळ (Cabinet Meeting) बैठकीला दांडी मारली होती. मंत्रीमंडळ बैठकीला मंत्रीच नसतील तर काय उपयोग? मंत्र्यांची अनुपस्थिती नजरेत भरणार होती. त्यामुळे अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना चांगलेच खडसावले आहे तसेच त्यांना तंबीही दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी यापुढे असे होता कामा नये, असे मंत्र्यांना बजावले आहे. 

'मंत्रीमंडळ बैठकीला कोणत्याही मंत्र्यांची दांडी नको, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना आदेश दिले आहेत. 'कितीही अडचण असेल तरी बैठकीला उपस्थित राहायचंच, असे स्पष्टच बजावले आहे. दांडी मारणाऱ्या मंत्र्यांना अजित पवार यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. याचीच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.

दांडी मारणाऱ्यांना मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रीमंडळ बैठकीला कोणत्याही मंत्र्यांने दांडी मारू नये, असे फर्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहे. कितीही अडचण असली तरीही मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिलंच पाहिजे, असं अजित पवार यांनी बजवाले आहे. बैठकांना अनेक मंत्री रेंज नाही, प्रवसात आहोत अशी कारण देत बैठकांना दांडी मारत असल्याचे अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या निदर्शनास आणून दिले. 

अनेक वेळा महाविकासआघाडी सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर येतात. मात्र, तिन्ही पक्षात मतभेद असले तरी मंत्रीमंडल बैठकीत ताळमेळ असण्याची गरज आहे. जेणेकरुन राज्य सरकार आणि प्रशासन यांच्यातील मतभेद पुढे येता कामा नये आणि मंत्रीमंडळ बैठीकत काय निर्णय झालेत आणि काय निश्चित झाले याची माहिती ही मंत्र्यांना आवश्यक आहे. जेणेकरुन ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगू शकतात. त्यामुळे यापुढे मंत्रीमंडळ बैठकीला मंत्र्यांची उपस्थिती बंधनकारक असेल, असे स्पष्ट अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.