राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर योजना

Maharashtra Saur Krushi Vahini Yojana 2023: राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी कृषी योजनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. 

Bollywood Life | Updated: Apr 19, 2023, 06:26 PM IST
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर योजना  title=

Maharashtra Saur Krushi Vahini Yojana 2023: राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) आताची मोठी बातमी. शेती पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा (Uninterrupted Power Supply) करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) घेण्यात आला. त्याचप्रमाणे वर्ष 2025 पर्यंत 30 टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  याचा लाभ राज्यातील 45 लाख कृषी वीज ग्राहकांना होणार आहे. 

वीज खरेदी करारानुसार वीज बिलाची रक्कम देण्यासाठी 700 कोटी रुपयांचा स्वतंत्र रिव्हॉल्विंग फंड देखील स्थापन करण्यात येणार आहे. चालू वर्षासाठी या करिता 100 कोटी रुपये इतका निधी, हरित ऊर्जा निधीमधून खर्च करण्यात येईल. या अभियानात वीज वाहिनीसाठीची जमीन अकृषी करण्याची गरज राहणार नाही. तसंच अशा जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पांना 30 वर्षांपर्यंत सर्व कर आणि शुल्कांतून सूट देण्यात येईल. कृषी वीज वाहिनी योजनेसाठीची जमीन नाममात्र एक रुपया वार्षिक भाडे पट्ट्याने देण्यास, यापुर्वीच मान्यता देण्यात आली आहे. 

या जमिनीची नोंदणी आणि मुद्रांक विभागाने ठरवलेल्या किंमतीच्या सहा टक्के दरानुसार किंवा प्रतिवर्षी 1 लाख 25 हजार प्रति हेक्टर यापेक्षा जी रक्कम जास्त असेल, त्या दराने वार्षिक भाडेपट्टा दर निश्चित करण्यात येईल. 2023 ते 24 आणि 2028 ते 29 या कालावधीसाठी एकूण 700 कोटी रुपयांच्या निधीस आणि त्यापैकी 2023-24 साठी 25 कोटी रुपये इतक्या निधीस हरित ऊर्जा निधीमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

दिव्यांगांना पदोन्नती आरक्षण धोरण लागू
राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी 4 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. केंद्र शासनाच्या 17 मे 2022 च्या आदेशाप्रमाणे राज्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट  ड ते गट  अ च्या निम्नस्तरापर्यंत पदोन्नती आरक्षण लागू करण्यात येईल. दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड मधून गट ड मधील, गट ड मधून गट क मधील, गट क मधून गट क मधील, गट क मधून गट ब मधील, गट ब  मधून गट ब मधील तसंच गट ब मधून गट अ मधील निन्मस्तरापर्यंत चार टक्के आरक्षण देण्यात येईल. 

अपंगत्वाच्या वेगवेगळ्या प्रकारनिहाय एकूण आरक्षण चार टक्के राहील. ज्या संवर्गात सरळ सेवेने नियुक्तीचे प्रमाण 75 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल अशाच संवर्गात दिव्यांगांना पदोन्नतीत आरक्षण राहील. या संदर्भातीस अन्य सर्व शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आले आहेत.