निवडणुकीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर; लवकरच पाच दिवसांचा आठवडा

निवडणुकीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर; लवकरच पाच दिवसांचा आठवडा

Updated: Jul 15, 2019, 10:00 PM IST
निवडणुकीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर; लवकरच पाच दिवसांचा आठवडा title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कर्मचाऱ्यांवर आश्वासनांची खैरात केली आहे. मुख्यमंत्री आणि राजपत्रित अधिकाऱ्यांची सोमवारी मुंबईत बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना भरघोस आश्वासने दिल्याचे समजते. 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाचा आठवडा पाच दिवसांचा केला जाईल. त्यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये निर्णय घेतला जाईल. यानंतर जानेवारी २०२० पासून हा निर्णय लागू केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

याशिवाय, सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याचे आश्वासनही या बैठकीत देण्यात आले. ऑगस्ट महिन्यात याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनंतर निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे मूळ वेतनावरील महागाई भत्ता ९ टक्क्यांवरून १२ टक्के इतका होईल.