टाळ्या आणि थाळ्या वाजवून कोरोना व्हायरस पळणार नाही- उद्धव ठाकरे

ही काही मौजमजेची वेळ नाही. तरीही नागरिक रस्त्यावर काय सुरु आहे, हे बघण्यासाठी बाहेर पडतात. 

Updated: Mar 23, 2020, 06:48 PM IST
टाळ्या आणि थाळ्या वाजवून कोरोना व्हायरस पळणार नाही- उद्धव ठाकरे title=

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महाराष्ट्रात संचारबंदी (Curfew) लागू करत असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी रविवारच्या जनता कर्फ्युनंतर रस्त्यावर एकत्र जमून अतिउत्साहीपणे थाळ्या वाजवणाऱ्या नागरिकांना चांगलेच फटकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला जनतेने चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी तुमचे आभार मानले आहेतच, त्यानंतर संध्याकाळी थाळ्या, घंटा वाजविल्या, पण हे सगळं करोनाला पळवण्यासाठी नव्हतं. तर करोनाशी लढा देणाऱ्या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना धन्यवाद देण्यासाठी होतं. घंटानाद, थाळ्या, टाळ्या वाजवल्या म्हणून व्हायरस गेला असं होत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 

अखेर महाराष्ट्रात कर्फ्यू; उद्धव ठाकरेंची घोषणा

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ८९ वर जाऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले. हा निर्णायक टप्पा आहे. पुढचे दिवस महत्वाचे आहेत, हे ओळखलं नाही तर वेळ मिळून आपण उपयोग केला नाही अशी गत होईल. अजूनही काही लोकांना हे संकट वाटत नाही. फेरफटका मारून येऊया, म्हणून ते बाहेर पडतात. मात्र असं करू नका, मौजमजा करण्याची वेळ नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना बजावले.

सध्या राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यात आहे. हा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्यात गेल्यास राज्यासमोर गंभीर संकट उभे राहू शकते. दरम्यान देशभरात आतापर्यंत ४१५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी २३ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरीही गेले आहेत. तर आतापर्यंत सातजण कोरोनामुळे दगावले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत दिली.