अधिकार मर्जीनुसार वापरता येतो का ? राज्यपाल नियुक्त जागांवरुन मुख्यमंत्र्यांचा निशाणा

अधिकार मान्य पण तो मर्जीनुसार वापरता येतो का ? असा प्रश्न उपस्थित

Updated: Dec 14, 2020, 08:04 AM IST
अधिकार मर्जीनुसार वापरता येतो का ? राज्यपाल नियुक्त जागांवरुन मुख्यमंत्र्यांचा निशाणा title=

मुंबई : अधिकार मान्य पण तो मर्जीनुसार वापरता येतो का ? असा प्रश्न उपस्थित करत मर्जी अधिकार यात फरक आहे असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. राज्यपाल नियुक्त सदस्य प्रकरणावर बोलत होते. विधिमंडळ राज्याचे भवितव्य ठरवणारे आहे. यासाठी संख्याबळ असावे. यातील १२ जागा राज्यपाल नियुक्त आहेत. त्याची शिफारस मंत्रीमंडळ करते.आजपासून अधिवेशन असून त्या १२ जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे याला कालावधी ठरवून द्यायला हवा. किती काळ जागा रिकामी ठेवावी यासाठी घटनेत दुरुस्ती करायला हवी असेही ते म्हणाले.

त्यांच्या तोंडात आणीबाणी शब्द शोभत असेल कारण देशात विरोधात बोलणाऱ्यांना दाबलं जातंय. देशभर यंत्रणांचा घरगुती कामगारांप्रमाणे वापर केला जातोय का याचा जनतेला संशय येतोय. राज्यात अघोषित आणीबाणी असेल तर देशात घोषित आणीबाणी आहे का ? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. शेतकरी आंदोलन करतायत त्यांच्यावर थंडीत पाण्याचे फवारे मारले जातायत. ही संवेदनशीलता नाही. भाजपचे नेते दिल्लीत जाऊन का बोलत नाहीत, महाराष्ट्रातील तथाकथित भाजप नेत्यांना हा कायदा कळलाय तो त्यांनी दिल्लीत जाऊन शेतकर्‍यांना समजून सांगावा

मराठा समाजाच्या आरक्षण कोर्टात असून आम्ही वेळोवेळी मराठा समाजाशी चर्चा करतोय, वकिलांशी चर्चा करतोय. जे ठरतंय चर्चेतून ते कोर्टात मांडलं जातंय. तसेच ओबीसीमध्ये विरोधकांनी गैरसमज पसरवू नये. ओबीसींच्या हक्काचे हिरावून घेतले जाणार नाही. त्यांना न्याय देण्यासाठी मंत्रीमंडळाची उपसमिती नेमली आहे. सामाजिक सलोखा बिघडण्याचे काम करू नये असे मुख्यमंत्री म्हणाले. 

आपल्याच अन्नदात्याला अतिरेकी ठरवणं हे चुकीचे आहे म्हणत त्यांनी रावसाहेब दानवेंना टोला लगावला. शेतकऱ्यांशी चर्चा करायचं सोडून तुम्ही त्यांना देशद्रोही, पाकिस्तानी ठरतंयाय. त्यांचे हक्क हिरावून घेता आणि पाकिस्तानातून कांदा, साखर आणायची म्हणता. हे अतिरेकी आहेत, पाकिस्तानी आहेत की चीनी आहेत हे भाजपने सर्व नेत्यांनी ठरवायचं असे मुख्यमंत्री म्हणाले.

गेले वर्ष सरकार कधी पडतंय आणि सरकार कधी पडणार याचे मुहुर्त काढण्यात गेलेत. त्यामुळे सरकारने काय कामं केली याकडे त्यांचं लक्ष गेलं नसेल असे म्हणत सरकारबद्द्ल कुठेही जनतेत नाराजी नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.