लोकांना हापूस, मासे उपलब्ध होणार

उपमुख्यमंत्र्यांची माहिती 

Updated: Mar 27, 2020, 01:34 PM IST
लोकांना हापूस, मासे उपलब्ध होणार title=

मुंबई : कोरोना रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना मासे आणि फळं मिळण्यात अडचणी येत असल्या तरी आता हापूस आंबे आणि मासे राज्यभरात उपलब्ध होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. गुढीपाडव्यापासून हापूसचा हंगाम सुरु होतो. पण लॉकडाऊनमुळे हापूस आणण्यात अडचणी होत्या.

राज्य सरकारनं याची दखल घेऊन आंबा आणि मासे वाहतुकीला अडचण येणार नाही याची खबरदारी घेतली आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, कोकणातील आंबे राज्याच्या कोणत्याही भागात विक्रीसाठी पाठवले जाऊ शकतात. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही मुंबईसह महाराष्ट्रात हापूस उपलब्ध होऊ शकेल आणि लोकांना घरबसल्या हापूसची चव चाखता येईल. पुण्यातील भाजी, फळं आणि मासळीबाजार आज किंवा उद्या सकाळपासून सुरु होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

मासेविक्रीला परवानगी

राज्य सरकारनं मासे विक्रीलाही परवानगी दिली आहे. राज्यात कुठल्याही बाजारात मासे विक्री केली जाऊ शकते, त्यात अडचण येणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. त्यामुळे राज्यातील नागरिकांना मासेही उपलब्ध होणार आहेत.

शेतकरी कर्जमाफी योजना थंडावली

लॉकडाऊनमुळे राज्य सरकारकडून राबवण्यात येणारी महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनाही काही काळासाठी थंडावली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. बायोमेट्रिक प्रक्रियेसाठी शेतकरीही पुढे येत नाहीत. त्यामुळे काही काळानंतर ही योजना पूर्ववत होईल. सध्या सरकारचं पूर्ण प्राधान्य कोरोनाशी लढण्याला आहे, असं उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं.

.... तर लष्कराच्या हॉस्पिटलचा वापर

आपत्कालीन स्थितीत गरज लागलीच तर लष्कराची हॉस्पिटल्सचा वापर करता येईल का? अशी विचारणा राज्य सरकारनं संरक्षण मंत्रालयाकडे केली आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.