Black and White: 'पोलिसांच्या बदल्या पैसे घेऊन झाल्या, म्हणून उद्धव ठाकरेंचं सरकार अडचणीत आलं'

'बोली लावून पोस्टिंग केल्यानंतर पोस्टिंग केलेले अधिकारी दुप्पट ताकदीने वसूली कशी करता येईल यामागे लागले' देवेंद्र फडणवीस यांनी मविआ काळात पोलीस दलातील हस्तक्षेपाचा केला पर्दाफाश

Updated: Feb 24, 2023, 07:13 PM IST
Black and White: 'पोलिसांच्या बदल्या पैसे घेऊन झाल्या, म्हणून उद्धव ठाकरेंचं सरकार अडचणीत आलं' title=

Devendra Fadanvis : महाविकास आघाडीच्या काळात (Mahavikas Aghadi) पोलीस दलात पैसे घेऊन बदल्या झाल्या, त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार अडचणीत आलं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे. 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमात मुख्य संपादक निलेश खरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.

काय म्हणाले फडणवीस
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हे त्यांच्या कर्माने जेलमध्ये गेले. एनएलीएलचा स्कॅम झाला होता, या स्कॅमची चौकशी करत असताना पुराव्यांवरुन असं लक्षात आलं की त्यात, कमर्शियल ट्रान्झॅक्शनचा डेटा तयार होत होता, आणि तो शेअर केला जात होता. या प्रकरणाच्या खोलात गेल्यावर आणखी माहिती मिळाली. माजी पोलीस आयुक्तांनी एक असं इक्वीपमेंट घेतलं होतं की त्या इक्विपमेंटच्या माध्यमातून सर्वांचं टॅपिंग केलं जात होतं, ती माहिती त्यांना दिली जात होती. त्या माध्यमातून दीड-दोन वर्षात कोट्यवधींचा चुना लावला गेला. त्याचे पुरावे होते, त्यामुळे ते जेलमध्ये गेले असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

'पोस्टिंग घेऊन बदल्या केल्या'
पोस्टिंग या पैसे घेऊन केल्या गेल्या, तर खात्यावर तुमचं कधीच कंट्रोल राहू शकत नाही. त्या काळात बोली लावण्यात आली, बोली लावून पोस्टिंग केल्यानंतर पोस्टिंग केलेले अधिकारी दुप्पट ताकदीने वसूली कशी करता येईल यामागे लागले. त्यामुळे अशा प्रकारचे वाझे तयार झाले. अशी परिस्थिती तयार करण्यात आली की, सचिन वाझेपेक्षा पाच पोस्ट वरती असणारे अधिकारीही त्याला साहेब बोलत होते, इतका त्याला अधिकार देण्यात आले होते अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

एखाद्या व्यक्तीला एखादी जागा देताना त्याचा अनुभव काय आहे हे देखील बघितलं पाहिजे, याआधी संजय पांडेंना कधी पोस्टिंग मिळालं नव्हतं, पण आता आणण्यामागे एकच उद्देश होता, की आम्हाला कसा त्रास दिला जाईल. अशा मानसिकतेने जेव्हा लोकं आणाल, तेव्हा तुमचं काम एक करतील आणि स्वत:ची दहा कामं करुन पूर्ण शिस्त बिघडवून टाकतील, असं फडणवीस यांनी सांगितलं.

मी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे मला म्हणाले होते की सचिन वाझेला परत घ्या म्हणून, त्यावेळीस मी ती फाईल पुढे पाठवली. त्यावेळी वरतून सांगण्यात आलं, यांना घेणं योग्य नाही, हा न्यायालयाचा अवमान होईल. त्यानंतर मी उद्धव ठाकरेंना सांगितलं, हे शक्य नाही म्हणून, मी नाकारलं. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सचिन वाझेंना सेवेत घेतलं असा गौप्यस्फोटच फडणवीस यांनी केला.